मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर कारला भीषण अपघात झाल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. कामशेत बोगद्याजवळ पहाटे ४ च्या सुमारास हा अपघात झाला आहे.
मुंबईहून पुण्याला येत असलेल्या एका मोटारीचा दुभाजकाला धडकून अपघात झाला. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात मोटारीतील तिघांचा जागीच मृत्यू झाला असून यात  अमित श्रीकांत सुळेभालीवर (वय २९, रा. यमुनानगर, निगडी),  संतोष सुरेश वृंदावत (वय ३८, रा. कर्वेनगर, पुणे) शरद कृष्णराव पवार (वय ३५ रा. वारजे माळवाडी, पुणे) यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. अपघातात ठार झालेले तिन्ही जण पुण्याचे असून, ते मुंबईला कामासाठी गेले होते. काम आटोपून पुण्याच्या दिशेने येत असताना गाडीचा महामार्गावरील कामशेत बोगद्याजवळ अपघात झाला. द्रुतगती महामार्गाच्या मधोमध असणाऱ्या दुभाजकाला आय-२० कार (एमएच-१४, डीएफ ५९९४) पहाटे ४ च्या सुमारास धडकली. महामार्ग पोलीस अधिकारी रमेश पोटे हे या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

(संग्रहित छायाचित्र)