वायू प्रदूषणाला आळा घालण्यासाठी राज्यात इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला आणि हरित ऊर्जेच्या निर्मितीला चालना देण्यात येईल. मुंबईतील बेस्टमध्ये पुढील पाच वर्षांत साधारण ३० टक्के इलेक्ट्रिक बस आणण्याचा मानस पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.

राज्य शासनाचा पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत सह्य़ाद्री राज्य अतिथीगृह येथे सोमवारी इलेक्ट्रिक वाहन तंत्रज्ञानाच्या दृष्टीने महाराष्ट्र वाहन धोरणामध्ये सुधारणा करण्यासाठी विविध भागधारकांसमवेत कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

एसटीमध्ये इंधनावर सुमारे ३ हजार कोटी रुपयांचा खर्च होतो. पण इलेक्ट्रिक बसेस वापरल्यास या खर्चात मोठी बचत होणार आहे. सध्या एसटी संकटात असून त्याला वाचविण्यासाठी ‘गो ग्रीन’कडे वळल्याशिवाय पर्याय नाही. या अनुषंगाने येत्या काळात एसटीमध्येही इलेक्ट्रिक बसेसच्या वापराला चालना देण्यात येईल, असे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले.