अकरावीसाठी नामांकित महाविद्यालयांची विद्यार्थ्यांना आस कायम अकरावीमध्ये पसंतीचे महाविद्यालय मिळवण्यासाठी घेतलेले प्रवेश रद्द करून ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वानुसार राबविण्यात येणाऱ्या प्रवेशफेरीमध्ये सहभागी होण्याकरिता आता विद्यार्थ्यांची धडपड सुरू आहे. नामांकित महाविद्यालयांमध्ये जागा शिल्लक नाहीत तरीही विद्यार्थी नामांकित महाविद्यालयांचा अट्टहास धरून निश्चित केलेले प्रवेश रद्द करत आहेत. एकीकडे शासननिर्णयानुसार, विद्यार्थ्यांला प्रवेश रद्द करण्यापासून रोखता येत नाही, तर दुसरीकडे पालक आणि विद्यार्थी रिक्त जागांचा विचार न करताच प्रवेश रद्द करण्यासाठी घाई करत आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांना प्रवेश रद्द करण्यापासून कसे रोखावे, असा प्रश्न शिक्षण उपसंचालक कार्यालयापुढे उभा राहिला आहे. अकरावीच्या खास फेरीनंतर ३०८३ विद्यार्थी प्रवेशाविनाच राहिले आहेत. तेव्हा या विद्यार्थ्यांसाठी ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वानुसार नवी प्रवेशफेरी राबविण्यात येत आहे. मात्र या नव्या फेरीमध्ये आधीच्या फेऱ्यांमध्ये प्रवेशित झालेल्या महाविद्यालयापेक्षा अजून चांगले महाविद्यालय मिळू शकेल या आशेने अनेक विद्यार्थ्यांनी प्रवेश रद्द करण्यासाठी सोमवारी शिक्षण उपसंचालक कार्यालयामध्ये धाव घेतली होती. ‘विशिष्ट विषय महाविद्यालयामध्ये नाही’, ‘घरापासून महाविद्यालय दूर आहे’ अशी अनेक कारणे देत प्रवेश रद्द करण्यासाठी विद्यार्थ्यांनी कार्यालयात गर्दी केली होती. महाविद्यालये प्रवेश रद्द करण्यास मान्य नाहीत म्हणून एका पाल्याने तर चक्क आम्हाला प्रवेशप्रक्रियेतून बाहेर पडायचे आहे, असे महाविद्यालयांना खोटे सांगून प्रवेश रद्द केल्याचेही या वेळी आढळून आले. त्यामुळे ही नवी फेरी जणू प्रवेशित महाविद्यालय बदलण्याची संधीच आहे, असाच समज अनेक पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये झाला असल्याचे या गर्दीतून जाणवले. ८४ टक्के गुण मिळविलेल्या एका विद्यार्थिनीने प्रकाश महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला होता; परंतु हे महाविद्यालय इंटीग्रेटेड असल्याचे कारण देत तिने सोमवारी सकाळी हा प्रवेश रद्द केला आहे. गट क्रमांक १ (८० ते १०० टक्के गुण मिळवणारे) साठी सोमवारी सुरूअसलेल्या प्रवेशफेरीतून आपल्याला प्रवेश मिळेल, यासाठी प्रवेश रद्द करून लगेचच तिने शिक्षण उपसंचालक कार्यालय गाठले होते; परंतु प्रवेश रद्द केल्यानंतर २४ तासांनंतर विद्यार्थ्यांला प्रवेशफेरीमध्ये सहभागी होता येते. या नियमामुळे तिला सोमवारच्या फेरीमध्ये सहभागी होता आले नाही. तेव्हा आता पुढच्या प्रवेशफेरीमध्ये सहभागी होण्याची सूचना शिक्षण उपसंचालक कार्यालयातून देण्यात आली आहे. ‘‘नामांकित महाविद्यालयांमध्ये आता जागा शिल्लकच राहिलेल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी जरी प्रवेश रद्द केले तरी त्यांना या महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळूच शकणार नाही. तसेच विद्यार्थ्यांनी प्रवेश रद्द केल्यानंतर त्यांना पुढे कोणत्या महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळेल याची जबाबदारी पालक आणि विद्यार्थ्यांचीच असणार आहे,’’ असे शिक्षण उपसंचालक बी.बी. चव्हाण यांनी सांगितले आहे. शासन निर्णय काय? नियमित आणि अतिरिक्त फेऱ्यांनंतर ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वानुसार राबविण्यात येणाऱ्या फेरीमध्ये विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने जागा रिक्त असणाऱ्या महविद्यालयांमध्ये जाण्याची मुभा असणार आहे. तसेच ही मुभा विद्यार्थी बारावीच्या परीक्षेस बसेपर्यंत उपलब्ध असणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेश रद्द करण्यापासून रोखता येणार नाही. ३० सेकंदांत जागा फुल्ल ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वानुसार राबविण्यात येणाऱ्या पहिल्या गटाच्या फेरीमध्ये नामांकित महाविद्यालयातील शिल्लक राहिलेल्या मोजक्या जागाही काही क्षणात भरल्या आहेत. मिठीबाई महाविद्यालयामधील कला शाखेमध्ये शिल्लक असलेली एक जागा प्रवेश सुरू झाल्यापासून अवघ्या ३० सेकंदांमध्ये भरली गेली. पुढच्या गटाच्या फेरीमध्ये चुरस पुढच्या गटाच्या म्हणजेच ६० ते १०० टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मोठी चुरस असणार आहे. या प्रवेशाच्या प्रतीक्षेत असलेले बहुतांश विद्यार्थी या गटातील आहेत. तसेच प्रवेश रद्द करण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांचा लोंढा वाढत राहिला तर पुढच्या गटाच्या फेरीमधील विद्यार्थ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. नाममात्र जागा शिल्लक असलेली महाविद्यालये जागा महाविद्यालये १ १०४ २ ८२ ३ ६५ ४ ४७ ५ ५१