मुंबईतील उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत घट झाली असून, सध्या ६ हजार १५९ रुग्णांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. दरदिवशी आढळणाऱ्या रुग्णांची संख्या कमी होत असल्याने दिलासादायक चित्र आहे. दरम्यान, सोमवारी ३४८ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर ७ जणांचा मृत्यू झाला.

सोमवारी ५०८ रुग्ण करोनामुक्त झाले. आतापर्यंत २ लाख ८८ हजारांहून अधिक म्हणजेच ९४ टक्के रुग्ण करोनातून बरे झाले आहेत. उपचाराधीन रुग्णांपैकी सुमारे ३०० रुग्णांची प्रकृती गंभीर आहे.

मुंबईतील रुग्ण वाढीचा सरासरी दर ०.२१ टक्क्यांवर स्थिर आहे. रुग्ण दुपटीचा सरासरी कालावधी तब्बल ४८६ दिवसांपर्यंत म्हणजे एक वर्षांहून जास्त झाला आहे. तर गेल्या नऊ महिन्यांत करोनामुळे दगावलेल्यांची एकूण संख्या ११ हजार ३०७ झाली आहे.

रविवारी ११ हजारांपेक्षा अधिक चाचण्या करण्यात आल्या. आतापर्यंत २७ लाखांहून अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत. एकूण चाचण्यांपैकी बाधित रुग्णांचे प्रमाण १२ टक्क्यांच्या खाली आहे. तसेच ‘आरटीपीसीआर’ चाचण्यांमधून बाधित आढळण्याचे प्रमाण साधारण एक टक्क्यावर आले आहे.

ठाणे जिल्ह्य़ात दिवसभरात २४९ जणांना करोना

* ठाणे जिल्ह्य़ात सोमवारी २४९ नवे करोनारुग्ण आढळले, तर आठ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या २ लाख ५२ हजार २०८, तर मृतांची संख्या ६ हजार १२२ इतकी झाली आहे.

* सोमवारी ठाण्यात ८३, कल्याण डोंबिवली ५६, नवी मुंबई ५०, मीरा भाईंदर १८, ठाणे ग्रामीण क्षेत्र १७, उल्हासनगर १२, बदलापूर सात, भिवंडी चार आणि अंबरनाथमध्ये दोन करोनाबाधित आढळले. तर ठाण्यात तीन, बदलापूर दोन, ग्रामीण क्षेत्र, अंबरनाथ आणि कल्याणमध्ये प्रत्येकी एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद करण्यात आली.