मुंबई : करोनाच्या दुसऱ्या लाटेत लागू करण्यात आलेल्या कडक र्निबधांमुळे मेट्रोचे प्रवासी घटले असून ‘मेट्रो १’ची दरदिवशीची प्रवासी संख्या ३५ हजारांपर्यंत रोडावली आहे. परिणामी मेट्रोच्या फेऱ्याही १०० पर्यंत घटल्या आहेत, अशी माहिती ‘मेट्रो १’च्या प्रशासनाकडून देण्यात आली. करोनामुळे सरकारने कडक र्निबध लागू केले असून सर्वसामान्यांच्या प्रवासावर बंधने आणली आहेत. करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अत्यावश्यक कामाशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असा आदेश सरकारने दिला. त्यामुळे सध्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, वैद्यकीय कामासाठी घराबाहेर पडणारे, लसीकरणासाठी जाणारे, लग्नसमारंभासाठी जाणारे कर्मचारी यांनाच मेट्रोत प्रवेश दिला जात आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान गेल्या वर्षी टाळेबंदीपूर्वी मेट्रोमधून कार्यालयीन दिवसात दरदिवशी सुमारे साडेचार लाख प्रवासी प्रवास करत होते. मेट्रोच्या ३००हून अधिक फेऱ्या सुरू होत्या. करोनामुळे गेल्या वर्षी टाळेबंदी लागू झाल्यानंतर मेट्रो सेवा खंडित करण्यात आली. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात मेट्रो पुन्हा धावू लागली होती. मात्र तिच्या फेऱ्या कमी करण्यात आल्या होत्या. मार्च महिन्यात मेट्रोच्या दरदिवशी २८० फेऱ्या सुरू होत्या. तसेच कार्यालयीन दिवसात मेट्रोमधून दरदिवशी १ लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करत होते. करोनाची दुसरी लाट सुरू झाल्यानंतर संसर्ग रोखण्यासाठी राज्यात र्निबध लागू करण्यात आले. परिणामी ‘मेट्रो १’च्या प्रवासी संख्येतही मोठी घट झाली असून कार्यालयीन दिवसांत ३५ हजार प्रवासी प्रवास करत आहेत, अशी माहिती ‘मेट्रो १’च्या अधिकाऱ्यांनी दिली.