मुंबईतील करोनाचा संसर्ग आटोक्यात येत असून रुग्णदुपटीचा कालावधी सरासरी ५२३ दिवसांवर पोहोचला आहे. बुधवारी दिवसभरात ४३४ नवे रुग्ण आढळले, तर ६ जणांचा मृत्यू झाला.

दरम्यान, मुंबईतील उपचाराधीन रुग्णांची संख्या कमी होऊन ५६४४ झाली आहे. रुग्णवाढीचा दरही ०.१३ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.

एकूण करोनाबाधितांची संख्या ३,०७,१६९, तर करोनाबळींची संख्या ११,३१९ वर पोहोचली आहे. बुधवारी दिवसभरात ४९९ रुग्ण बरे होऊन घरी गेले.आतापर्यंत दोन लाख ८९ हजारांहून अधिक म्हणजेच ९४ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत घट झाली असून, सध्या ५६४४ रुग्ण उपचाराधीन आहेत. त्यापैकी सुमारे दोन हजार रुग्णांना लक्षणे आहेत. ३०० रुग्णांची प्रकृती गंभीर आहे.

मुंबईत दररोज सरासरी १५ हजार चाचण्या केल्या जात आहेत. त्यापैकी ५ टक्क्यांपेक्षाही कमी अहवाल बाधित येत आहेत. आतापर्यंत २७ लाख ४२ हजारांहून अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत. एकूण चाचण्यांपैकी बाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाण १२ टक्कय़ांच्या खाली घसरले आहे. तर आरटीपीसीआर चाचण्यांमधून बाधित आढळण्याचे प्रमाण साधारण एक टक्कय़ावर आले आहे.

धारावी आणि दादरमध्ये स्थिती नियंत्रणात

एकेकाळी अतिसंक्रमित असलेल्या धारावीमध्ये तिसऱ्यांदा शून्य रुग्णाची नोंद झाली आहे. दादर आणि धारावीत बुधवारी एकही नवीन रुग्ण आढळला नाही. दादर भागात सध्या ८४, तर धारावीत १४ रुग्ण उपचाराधीन आहेत.