अकरावीच्या प्रवेशाची चौथी यादी कालच जाहीर झाली. मात्र अद्यापही ३२ हजार विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेला नाही. विशेष म्हणजे यातील अनेक विद्यार्थ्यांना दहावीच्या परीक्षेत चांगले गुण आहेत. मुंबईतून चौथ्या प्रवेशफेरीसाठी ८१,०६३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील ५०,००० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. प्रवेशप्रक्रियेच्या नियमांमध्ये सातत्याने नियम बदलत असल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचे विद्यार्थी आणि पालकांचे म्हणणे आहे. प्रवेशप्रक्रिया ऑनलाईन असून पहिल्या तीन फेऱ्यांमध्ये ज्यांना प्रवेश मिळाला नाही अशा विद्यार्थ्यांनी चौथ्या फेरीसाठी नोंदणी केली होती. एक किंवा दोन मार्कांनी आम्हाला हव्या असलेल्या महाविद्यालयात पहिल्या फेऱ्यांमध्ये प्रवेश मिळू शकला नाही. मात्र आता चांगले महाविद्यालय मिळावे अशी आशा असल्याचे विद्यार्थ्यांनी म्हटले आहे. आता अल्पसंख्यांक महाविद्यालयातील कोट्यामध्ये असणाऱ्या जागा उपलब्ध आहेत. परंतु त्या प्रवेशांबाबतही अद्याप स्पष्टता नाही. आता मिळणारे प्रवेश हे मेरीटनुसार मिळणार का याबाबत अद्यापही शंका असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. या विद्यार्थ्यांना दहावीमध्ये ८० टक्के मिळाले आहेत. आपला प्रवेश सुरक्षित आहे की नाही याबाबत स्पष्टता नसल्याने असंख्य पालक आणि मुलांनी शिक्षण मंडळाबाहेर चौकशीसाठी रांगा लावल्या होत्या. याविषयी सांगताना शिक्षण मंडळाचे कार्यकारी उपसंचालक राजेंद्र अहिरे म्हणाले, एकही विद्यार्थी प्रवेशीविना राहणार नाही याची आम्ही ग्वाही देतो. अल्पसंख्यांक आणि मॅनेजमेंट कोट्यातील जागा विशेष फेरीसाठी उपलब्ध असणार की नाही याबाबत अद्याप संभ्रम आहे. हे प्रकरण अद्याप न्यायप्रविष्ट असून त्याच्या निर्णयासाठी थांबल्याचेही अहिरे यांनी स्पष्ट केले. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडे हे प्रकरण असल्याचेही त्यांनी सांगितले.