रुग्णदुपटीचा कालावधीही ५१ दिवसांवर

मुंबई : मुंबईमधील करोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७० टक्क्य़ांवर पोहोचले असून रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ५१ दिवस झाला आहे. विविध उपाययोजनांमुळे संसर्गावर नियंत्रण मिळविण्यात यश येत असल्याचा दावा पालिकेकडून करण्यात आला आहे.

करोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या संशयित रुग्णांचा शोध, त्यांचे संस्थात्मक विलगीकरण करणे, घरोघरी जाऊन व फिरते दवाखाने, विशेष शिबिरांच्या माध्यमातून केली जाणारी तपासणी आणि चाचणी आदींमुळे करोनाबाधितांचा वेळीच शोध घेणे पालिकेला शक्य झाले आहे. पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी २२ जून रोजी ‘मिशन झिरो’ अभियानाची घोषणा केली. त्यावेळी मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी ३७ दिवस होता. १ जुलै रोजी तो ४२ दिवसांवर पोहोचला, तर १३ जुलै रोजी तो ५१ दिवस असा झाला. १ जुलै रोजी करोनाबाधित रुग्ण वाढीचा सरासरी दर १.६८ टक्क्य़ांवर होता. तो आता १.३६ टक्के झाला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण २२ जून रोजी ५० टक्के होते. ते आता ७० टक्क्य़ांवर पोहोचले आहे.

विविध समर्पित करोना रुग्णालये व करोना आरोग्य केंद्रे मिळून २२ हजार ७५६ खाटा उपलब्ध आहेत. यापैकी १० हजार १३० खाटा रिकाम्या आहेत. दरम्यान, पालिकेकडून होणाऱ्या करोना चाचण्यांची दैनंदिन क्षमता पूर्वीच्या सरासरी चार हजार वरून आता सहा हजारापर्यंत वाढली आहे. बाधित रुग्ण आढळण्याचे दैनंदिन सरासरी प्रमाण पूर्वी १,४०० होते. ते आता १,२०० पर्यंत खाली आले आहे, अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.