राज्य भारनियमनमुक्त जाहीर झाले असले तरी वीजचोरी आणि अल्प वसुलीच्या निकषामुळे राज्याच्या जवळपास १७ टक्के भागात अद्यापही भारनियमन सुरू आहे. त्यातही वीजचोऱ्यांच्या अतिरिक्त प्रमाणामुळे जालना, औरंगाबाद, अहमदनगर, जळगाव अशा सात जिल्ह्य़ांतील सुमारे ७५ टक्के भाग भारनियमनामुळे अंधारात आहे. दरम्यान,अनेक उपाय थकल्यानंतर आता या भागातील वीजचोरीला आळा घालण्यासाठी आता ‘महावितरण’ने अध्यात्माच्या मार्गाचा अवलंब सुरू केला आहे. त्यासाठी कीर्तन, प्रवचनांच्या माध्यमातून लोकांना जागरूक करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.
वीजचोरी जास्त असलेल्या भागातील उपाययोजनांमुळे येत्या काही काळात वीजचोऱ्या कमी झाल्या नाहीत, वसुली वाढली नाही तर त्या भागाच्या मुख्य अभियंत्याला त्यासाठी जबाबदार धरण्यात येणार आहे. तसेच याबाबतची नोंद मुख्य अभियंत्याच्या वार्षिक गोपनीय अहवालातही करण्याचे ‘महावितरण’ने ठरवले आहे.
राज्य भारनियमनमुक्त करताना ४२ टक्क्यांपेक्षा अधिक वीजचोरी आणि अल्प वीजबिल वसुली असलेल्या भागांत भारनियमन सुरूच ठेवण्याचे धोरण जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार राज्यातील १३०० फीडरवर सध्या भारनियमन सुरू आहे. त्यापैकी ७६९ फीडर हे जालना, औरंगाबाद, अहमदनगर, जळगाव, नंदुरबार, वाशिम, परभणी या सात जिल्ह्य़ांत आहेत. मात्र अतिरिक्त वीजचोरी आणि अल्प वसुली यामुळे या सात जिल्ह्य़ांचा ७५ ते ८० टक्के भाग अद्यापही भारनियमनाचे चटके सहन करत आहे.

वीजचोरीवर ‘आध्यात्मिक’ उपायाची मात्रा
वीजचोरी रोखण्यासाठी आता ‘महावितरण’ने लोकांच्या अध्यात्मिक भावनेला हात घातला आहे. कीर्तन, प्रवचन अशा माध्यमातून जागरूकता निर्माण करून लोकांना वीजचोरीपासून रोखण्याचे आणि विजेचे पैसे भरण्याचे आवाहन करण्यात येत आहे. वीजचोरी कमी झाली, पैशांची वसुली वाढली तर तुम्हालाही भारनियमनाचा त्रास सोसावा लागणार नाही, असा संदेश या कीर्तन, प्रवचनांमधून दिला जात आहे. तसेच पथनाटय़ातूनही लोकांचे लक्ष वेधण्यात येत आहे. भारनियमनामुळे गावाचा विकास कसा रखडतो, त्यामुळे तरुणपिढी आणि सध्या शाळा-महाविद्यालयांत असलेल्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यात कशा अडचणी येतील याबाबतही प्रबोधन करण्यात येत आहे.