दोन वर्षे मंदीच्या गर्तेत अडकलेला गृहबांधणी उद्योग कसाबसा सावरत असताना आता ‘करोना’चे जागतिक संकट उद्भवल्याने या उद्योगाचा आर्थिक कणाच मोडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. यंदा जानेवारी-फेब्रुवारीत ग्राहकांनी दाखविलेला रस पाहून विकासक उत्साहित झाले होते; पण त्यांनी मार्चपर्यंत अपेक्षित धरलेल्या नोंदणीत आता ७८ टक्के घट झाली आहे. चिंतेची बाब म्हणजे देशभरात टाळेबंदी जाहीर होण्याआधीच्या काही महिन्यांत ग्राहकांनी केलेली नोंदणी रद्द होण्याचे प्रमाण तब्बल २०० टक्क्यांवर पोहोचल्याचे ‘एमसीएचआय-क्रेडाई’च्या अहवालात म्हटले आहे. या आर्थिक संकटातून सावरण्यासाठी विकासकांना काही महिने लागतील, अशी भीती ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्रीज-कॉन्फर्डेशन अॅण्ड रिएल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया’ (एमसीएचआय-क्रेडाई)ने व्यक्त केली आहे. ‘कोव्हिड १९ : स्थावर संपदेवर परिणाम’ असे या अहवालाचे नाव आहे. संघटनेच्या शंभर बडय़ा विकासकांकडील तपशील तपासून हा अहवाल तयार केला आहे.जानेवारी-फेब्रुवारीत ग्राहक मोठय़ा संख्येने घरनोंदणीसाठी आकर्षित झाले होते. मात्र, त्यानंतर घरनोंदणीत घट नोंदविण्यात आली. ‘एमसीएचआय-क्रेडाई’चा अहवाल * मुंबई, ठाणे आणि परिसरातील तब्बल साडेसात हजारांहून अधिक ग्राहकांनी मार्चमध्ये बांधकामाची स्थिती पाहण्यासाठी नावे नोंदविली होती. ती सर्व रद्द झाली आहेत. * जानेवारी-फेब्रुवारीत ज्यांनी घरांची नोंदणी केली, त्यापैकी बहुसंख्य ग्राहकांकडून नोंदणी रद्द. * अॅनारॉक प्रॉपर्टी कन्सल्टंट’चा अहवाल * जानेवारी ते मार्च २०२० या कालावधीत मुंबई महानगर प्रदेश परिसर आणि पुण्यात घरांची नोंदणी ४२ टक्कय़ांनी घटली. * या काळात मुंबई महानगर प्रदेश परिसरात १३ हजार ९१० घरांची विक्री. हेच प्रमाण ऑक्टोबर-डिसेंबर २०१९ मध्ये १८ हजार ३२० होते. * पुण्यात यंदाच्या पहिल्या तिमाहीत ७,२०० घरांची विक्री. ती मागील तिमाहीत ९,४१० होती.