खासगी रुग्णालयांत रुग्णांना खाट-उपचार मिळण्यासाठी त्रास होऊ नये यादृष्टीने मुंबई महापालिकेने व्यवस्था उभारण्याची आग्रही मागणी मंत्रिमंडळातील सदस्यांनी केल्यानंतर सर्व खासगी रुग्णालयांमध्ये पालिकेचे अधिकारी नियुक्त करून नियंत्रण करण्याचा आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. करोनावरील उपाययोजनांचा आढावा मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. खासगी रुग्णालयात ८० टक्के खाटा राखीव ठेवण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी काटेकोर होत नसल्याबाबत मुंबई-ठाण्यातील मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. सरकारने ८० टक्के खाटा राखीव ठेवण्याचा आदेश दिला असताना काटेकोर अंमलबजावणी का होत नाही, अशी विचारणा परिवहनमंत्री अनिल परब यांनी महानगरपालिका आयुक्त आय. एस. चहल यांना के ली. खासगी रुग्णालयांत रुग्णांना खाट-उपचार मिळण्यासाठी त्रास होऊ नये यादृष्टीने महापालिके ने यंत्रणा उभारली पाहिजे, अशी आग्रही मागणी परब यांनी केली. यानंतर करोनाकाळात खासगी रुग्णालयांच्या नियंत्रणासाठी पालिकेचे अधिकारी नेमण्याचा आदेश मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिला. त्यावर तातडीने अशी यंत्रणा उभारण्यात येईल आणि येत्या पाच-सहा दिवसांत परिस्थिती बदललेली दिसेल, अशी ग्वाही चहल यांनी मंत्रिमंडळाला दिली.