मुंबई : मुंबईत शनिवारी ९९३ करोनाबधित रुग्ण आढळून आले, तर ३२ रुग्णांचा मृत्यू झाला. येथील करोनामुक्तांचे प्रमाण ८८ टक्के असून, रुग्णवाढीचे प्रमाण ०.४२ टक्क्यांवर घसरले आहे.

गेल्या पंधरवडय़ात करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत चढ-उतार होत आहेत. गेले दोन दिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होत होती, परंतु शुक्रवारी रुग्णसंख्या एक हजाराच्या खाली घसरली आहे. मुंबईत शनिवारी ९९३ जणांना बाधा झाली असून एकूण बाधितांची संख्या दोन लाख ५७ हजार ५०० वर पोहोचली आहे. आतापर्यंत १० हजार २५० करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

शुक्रवारी ६८० रुग्ण करोनामुक्त झाले. आतापर्यंत दोन लाख २७ हजार ८२२ रुग्ण बरे झाले आहेत. आजघडीला विविध रुग्णालयांमध्ये १८ हजार ७५३ रुग्ण उपचार घेत आहेत.

करोनाबाधित रुग्णांचा शोध घेण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर चाचण्या करण्यात येत आहेत. आतापर्यंत १५ लाख २६ हजार ४६० चाचण्या करण्यात आल्या आहेत.

ठाणे जिल्ह्य़ात ६४५ नवे बाधित

ठाणे जिल्ह्य़ात शनिवारी ६४५ करोना रुग्ण आढळून आले. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या २ लाख ११ हजार ५२२ वर पोहोचली आहे. दिवसभरात १९ रुग्णांचा मृत्यू झाल्याने करोनाबळींची संख्या ५ हजार ३४२ इतकी झाली आहे.

शनिवारी आढळलेल्या रुग्णांमध्ये ठाणे शहरातील १६३, नवी मुंबई शहरातील १४९, कल्याण-डोंबिवली शहरातील १३६, मीरा-भाईंदरमधील ८२, ठाणे ग्रामीणमधील ३८, अंबरनाथमधील ३१, उल्हासनगरमधील १९, भिवंडीतील १४ आणि बदलापूरमधील १३ रुग्णांचा समावेश आहे.

मृतांमध्ये मीरा-भाईंदरमधील ५, ठाणे शहरातील ३, नवी मुंबईतील ३, ठाणे ग्रामीणमधील ३, अंबरनाथमधील ३ तर कल्याण-डोंबिवलीतील आणि उल्हासनगरमधील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

राज्यात ५,५४८ नवे रुग्ण

’  राज्यात शनिवारी ५,५४८ रुग्णांची नोंद झाली, तर ७,३०३ जण करोनामुक्त झाले. गेल्या २४ तासांत ७४ रुग्णांचा मृत्यू झाला.

’ राज्यात आतापर्यंत एकूण १५ लाख १० हजार ३५३ बाधित बरे होऊन घरी परतले. सध्या २५ लाख ३७  हजार ५९९ व्यक्ती गृहविलगीकरणात, तर १२ हजार ३४२ रुग्ण संस्थात्मक विलगीकरणात आहेत.