मुंबई परिसरात लूटमार करणाऱ्या पाच तरुणांना गुन्हे शाखा ४ च्या पथकाने सोमवारी अटक केली. या तरुणांनी आतापर्यंत २४ गंभीर गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.भररस्त्यात लूटमार करणाऱ्या एका टोळीतील काही गुंड सायन किल्ला येथे येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा ४ च्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार सापळा लावून तीन मोटारसायकलींवर आलेल्या पाच तरुणांना अटक केली. सोनू देवेंद्र (२१), विनायक कल्लुरे (१९), मंगेश देवेंद्र (१९), मुनिल सहानी (२०), रवी मुदलीयार (२०) अशी या आरोपींची नावे आहेत.
याबाबत माहिती देताना गुन्हे शाखा ४ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक वत्स यांनी सांगितले की, हे सर्व आरोपी मोटारसायकलीवरून फिरत असतात. कुणी एकटा दिसला की त्याच्याजवळील सोन्याची चेन, रोख रक्कम घेऊन पोबारा करत असत.
या आरोपींनी मुंबई आणि परिसरात २४ हून अधिक गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. हे सर्व आरोपी अँटॉप हिल, सायन आदी परिसरात राहणारे आहेत.