'चला हवा येऊ द्या'फेम विनोदवीर, अभिनेता भारत गणेशपुरे यांच्यासोबत एक धक्कादायक प्रसंग घडला आहे. कांदिवलीतील वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर त्यांचा मोबाईल काही अज्ञातांच्या टोळीने लंपास केला असून अत्यंत विचित्र पद्धतीने त्यांनी ही चोरी केल्याचं भारत गणेशपुरे यांनी सांगितलं आहे. फेसबुकवर एक व्हिडीओ शेअ करत त्यांनी ही माहिती दिली असून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. ''आज माझा मोबाईल अक्षरश: लुटून नेला आहे. कांदिवलीतील वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेच्या फ्लाय ओव्हरवर काही टोळक्यांनी माझा फोन चोरुन नेला. काल प्रचंड पाऊस होता आणि त्यातच दरड कोसळल्यामुळे हायवेवर खूप ट्रॅफिक झालं होतं. एकीकडे भरपूर पाऊस आणि त्यात वाहतूककोंडी यामध्ये दोन माणसं माझ्या गाडीजवळ आली आणि त्यांनी विचित्र पद्धतीने गाडीच्या काचा वाजवण्यास सुरुवात केली. मात्र मी तरीदेखील काचा उघडल्या नाहीत. परंतु, माझ्या बाजूला असलेल्या माणसाने काचा उघडल्या. त्याचवेळी गाडीबाहेर उभ्या असलेल्या माणसाने चित्रविचित्र हावभाव करण्यास सुरुवात केली. मी त्याच्याकडे पाहात असतानाच दुसऱ्या माणसाने माझा मोबाईल चोरला", असं भारत गणेशपुरे म्हणाले. पुढे ते म्हणतात, "ही घटना माझ्यासोबत घडली आहे. मात्र तुम्ही सतर्क रहा. सध्या करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे खूप गोष्टी घडत आहेत. जर तुम्हाला अशी घटना घडण्याची शक्यता जाणवली तर पहिले गाडी नीट बंद करा आणि काचा उघडू नका. कोणी तुम्हाला निर्दयी म्हटलं तरी चालेल. सध्या दिवस फार वाईट आहेत. या टोळींमध्ये बायका, लहान मुलं, मोठी मुलं अशा अनेकांचा समावेश असतो. चोरांची ही टोळी विविध पद्धतीने तुम्हाला अडकवण्याचा प्रयत्न करेल पण तुम्ही गाडीतून बाहेर उतरु नका. माझा मोबाईल माझ्या मुर्खपणामुळे गेला". दरम्यान, याप्रकरणी भारत गणेशपुरे यांनी पोलीस तक्रार केली असून पोलिसांनीही मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे. परंतु, प्रवास करताना प्रत्येकाने काळजी घ्या असं आवाहनही भारत गणेशपुरे यांनी केलं आहे.