अभिनेत्री पायल घोषने आज रामदास आठवले यांच्या उपस्थितीत आरपीआयमध्ये प्रवेश केला आहे. दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचे आरोप केल्याने अभिनेत्री पायल घोष चर्चेत आली होती. अनुराग कश्यपविरोधात पायल घोषने पोलिसातही धाव घेतली होती. मात्र पोलीस चौकशी न झाल्याने तिने आपले म्हणणे राज्यपाल भगतसिंह कोश्यारींकडे मांडले होते. पायल घोषला आरपीआयचे प्रमुख रामदास आठवले यांनी पाठिंबा दिला होता. आज रामदास आठवलेंच्या उपस्थितीत पायल घोषने आरपीआयचा झेंडा हाती घेतला.

केंद्रीय सामाजिक आणि न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेत पायल घोषचा आरपीआयमध्ये पक्षप्रवेश झाला. पायल घोष, कनिष्का सोनी, बिल्डर योगेश करकेरा, उद्योजक अंकुर चाफेकर यांनी आज आरपीआयमध्ये प्रवेश केला आहे.

काय म्हणाले आठवले?
पायल घोष आरपीआय मध्ये आल्याचं रामदास आठवलेंनी जाहीर केलं. त्यानंतर ते म्हणाले की पायल घोष यांच्यावर अन्याय झाला. अनुराग कश्यपविरोधात तिने वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तिच्यावर अन्याय झाल्याने आपण तिची बाजू घेतली, आंदोलन केलं. राज्यपालांना भेटलो, त्यानंतर या प्रकरणी पुढील हालचाली सुरु झाल्या. मात्र अद्याप पोलिसांनी अनुराग कश्यपला अटक केलेली नाही. त्याच्याविरोधात कोणतीही कारवाई केलेली नाही. या सगळ्यात आम्ही पायल घोष यांच्यासोबत आहोत.