अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या खुनाच्या आरोपाखाली आदित्य ठाकरे गजाआड जाणार, ही केस अजून संपलेली नाही. अशा शब्दांत भाजपा नेते नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर आज प्रतिहल्ला चढवला. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात आमचे हात स्वच्छ असल्याचं सांगताना भाजपा नेत्यांचं नाव न घेता त्यांनी ठाकरे कुटुंबावर शेण खाऊन गोमुत्राच्या गुळण्या केल्याचं विधान मुख्यमंत्र्यांनी केलं होतं. त्याला राणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. "काल उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात मुलगा आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना सीबीआय प्रकरणी स्वतःहून क्लीनचीट दिली, आश्चर्य आहे. सीबीआयचा अंतिम अहवाल अद्याप आलेला नाही आणि हे म्हणतात आमचे हात स्वच्छ आहेत. सुशांतची आत्महत्या नाही, तर तो खूनच आहे. खूनाचे आरोपी आज ना उद्या गजाआड जातील. त्यात एक मंत्रीही असेल आणि तो यांचा मुलगा असेल," अशा शब्दांत राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर प्रहार केला. आणखी वाचा- मोदींची कृपा, नाहीतर स्वतःच्या नावावर २५ आमदारही निवडून आले नसते; राणेंचं ठाकरेंवर टीकास्त्र "किती लपवाल आणि लपवण्याचा किती प्रयत्न कराल, पोलिसांचा वापर कराल. पोलिसांचा वापर करुन स्वतःच्या मुलाला वाचवणं म्हणजे सत्तेचा दुरुपयोग आहे. सुशांतच्या केसमध्ये स्वतःहूनच काल तुम्ही आपल्या मुलाला क्लीनचीट देऊन टाकली, तुम्हाला लवकरच कळेल. सुशांतला मारलं की त्यानं आत्महत्या केली यामध्ये कोण कोण सामिल होतं. त्याला कशाने मारलं हे सर्व बाहेर येईल. त्यात दिशाच्या मृत्यूचं प्रकरणंही बाहेर येईल. हे काही लपणारं नाही. सीबीआयने या प्रकरणाची केस अद्याप बंद केलेली नाही. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी अज्ञानात राहू नये" अशी ठाकरेंवर राणेंनी पुन्हा आरोपांची सरबत्ती केली.