विद्यार्थ्यांच्या तक्रारीनंतरही विद्यापीठ प्रशासनाचे दुर्लक्ष मुंबई विद्यापीठाच्या ऐतिहासिक राजाबाई टॉवरला नूतनीकरणानंतर झळाळी आली असली तरी याच इमारतीत असणारे ग्रंथालय मात्र धूळ खात पडले आहे. वाचनाच्या टेबलावर दिव्यांची अनुपलब्धता, दिवे लावण्यासाठी मोकळ्याच सोडलेल्या विजेच्या तारा, उघडय़ावरच रचल्याने धुळीचा थर साठलेली दुर्मीळ पुस्तके आणि ग्रंथालयाशी दूरवरही संबंध नसलेले इथले कर्मचारी यामुळे ग्रंथालयाची जागा दुरुस्त केली असली तर प्रत्यक्ष ग्रंथालयाची मात्र दुर्दशाच आहे. विद्यापीठाच्या अनास्थेमुळे यामध्ये अजूनच भर पडत असून विद्यार्थ्यांनी अनेकदा तक्रार करून विद्यापीठ प्रशासनाच्या नजरेस आणले असले तरी विद्यापीठाने मात्र याकडे निव्वळ दुर्लक्ष केले आहे. विद्यापीठातील राजाबाई टॉवरमधील ग्रंथालय अत्यंत जुने असून दुर्मीळ अशी पुस्तके आणि ग्रंथांचा अनमोल ठेवा इथे उपलब्ध आहे. त्यामुळे मुंबईतीलच नव्हे तर परदेशातीलही संशोधन करणारे विद्यार्थी या ग्रंथालयाला आवर्जून भेट देतात. तीन वर्षांपूर्वी टाटा कन्सल्टन्सी सव्र्हिसेस या कंपनीच्या सहकार्याने सुमारे चार कोटी रुपये खर्च करून राजाबाई टॉवरच्या इमारतीचे नूतनीकरण करण्यात आले. कुलगुरुपदावरून पायउतार होता-होता माजी कुलगुरू राजन वेळूकर यांनी नूतनीकरणानंतर झळकलेल्या या इमारतीचे उद्घाटनही केले. मात्र दुरुस्तीच्या कामानंतर इमारतीला चकाकी आली असली तरी इमारतीतील ग्रंथालयाची अवस्था मात्र सुधारलेली नाही. तीन वर्षांपूर्वी ग्रंथालयाची दुरुस्ती करण्यात आली असली तरी अद्याप इथल्या वाचनाच्या टेबलावर साधे दिवेही लावण्यात आलेले नाहीत. त्यामुळे संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना संध्याकाळी सहानंतर पुरेसा प्रकाश नसल्यामुळे अडचण होत आहे. या टेबलांवर दिवे लावण्यासाठी विजेच्या ताराही मोकळ्याच सोडण्यात आल्या आहेत. ग्रंथालयातील बहुतांश जुन्या लाकडी खुच्र्याच्या जागी कार्यालयातील कर्मचारी वापरत असलेल्या साध्या खुच्र्या दिसत आहे. तसेच नव्याने बसविण्यात आलेल्या बऱ्याचशा खिडक्यांना कडय़ा नाहीत. त्यामुळे सुतळीने त्या बांधल्या जातात. ग्रंथालयाच्या बाहेरील मोकळ्या जागेत तर दुर्मीळ अशी फाटलेली काही पुस्तके रद्दीत टाकल्याप्रमाणे पडलेली आहेत. ग्रंथालयातील अनमोल अशी असंख्य पुस्तके आणि ग्रंथ उघडय़ावरच ठेवलेले असल्याने त्यावर धुळीचा थर जमा झाला आहे. ग्रंथालयात पुस्तक शोधण्यासाठी लेखक वा पुस्तकांच्या नावांच्या खणामध्ये आजही पूर्वी वापरल्या जात असलेल्या चिठ्ठय़ा आहेत. चिठ्ठय़ांमधून पुस्तकाची नवीन आवृत्ती मिळविणे हे अडचणीचे ठरत आहे. ग्रंथालयामध्ये पूर्णवेळ ग्रंथपाल नाही. त्यामुळे येथे किमान शिकलेली मुलेच ग्रंथालयाचे काम बघत असतात. अनुभवी ग्रंथपाल नसल्याने ग्रंथ शोधण्याबाबत मार्गदर्शनही मिळत नाही. ग्रंथालयाची अपुरी वेळ ग्रंथालयाची वेळ सकाळी १० ते संध्याकाळी ६ असल्यामुळे विद्यापीठातील संशोधन करणाऱ्या तसेच विधिच्या विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. विधिच्या परीक्षा आता २३ जानेवारीपासून सुरू होत असल्यामुळे तरी किमान ग्रंथालयाची वेळ रात्री ८ वाजेपर्यत वाढवावी, अशी मागणीही विद्यार्थ्यांनी विद्यापीठ प्रशासनाकडे केली होती. यावर विद्यार्थ्यांसाठी हे ग्रंथालय खुले करण्याचे कुलसचिव दिनेश कांबळे यांनी सांगितले होते. मात्र त्यालाही आता आठवडा उलटला तरी अद्याप ग्रंथालयाची वेळ वाढविलेली नाही, की या विद्यार्थ्यांनी अभ्यासासाठी पर्यायी खोली ही उपलब्ध करून दिलेली नाही. त्यामुळे विद्यापीठाचे ग्रंथालय असूनही विद्यार्थ्यांसाठी मात्र त्याची दारे बंदच आहेत, असे विधिच्या विद्यार्थ्यांनी मांडले आहे.