वसरेवा किनाऱ्यावर कासवांची ८० पिल्ले; स्वच्छता मोहिमेचे फळ असल्याचे तज्ज्ञांचे मत दापोलीच्या किनाऱ्यावर कासव महोत्सवाला सुरुवात झालेली असताना गुरुवारी पहाटे मुंबईतील वर्सोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर तब्बल २० वर्षांनंतर कासवाचे घरटे आढळून आले. घराटय़ाबाहेर पडणाऱ्या ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या सुमारे ८० कासवांच्या पिल्लांना सागरी परिसंस्थेच्या संवर्धनासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी वन विभागाच्या मदतीने समुद्रात सोडले. मुंबईतील समुद्रकिनाऱ्यांच्या ऱ्हासामुळे आणि घाणीमुळे कासवांनी या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रजनन करणे बंद केले होते. परंतु, गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने स्वच्छ करण्यात येत असलेल्या वसरेवा किनारी कासवांना हवा तो निवारा मिळाल्याने त्यांनी येथे प्रजनन केल्याचे स्पष्ट झाले. मुंबईच्या सागरी परिक्षेत्रात मुख्यत्वे समुद्री कासवांच्या ‘ऑलिव्ह रिडले’ आणि ‘ग्रीन सी टर्टल’ प्रजातींच्या कासवांचा अधिवास आहे. नोव्हेंबर ते मार्च हा कालावधी कासवांच्या प्रजननाचा कालावधी असतो. यादरम्यान मादी कासव वाळुकामय समुद्रकिनाऱ्यावर खड्डा करून त्यामध्ये साधारण १०० ते १५० अंडी घालते. ४५ ते ५५ दिवसांमध्ये या अंडय़ांमधून कासवांची पिल्ले बाहेर पडतात. विशेष म्हणजे मादी कासव दरवर्षी त्याच किनाऱ्यावर अंडी घालण्यासाठी येते. मात्र सुमारे २० वर्षांनंतर मुंबईच्या किनारपट्टीक्षेत्रात कासवाचे घरटे आढळून आले आहे. त्यामुळे सागरी परिसंस्थेच्या अभ्यासकांचा उत्साह वाढला आहे. वर्सोवा किनारा स्वच्छतेचे प्रणेते अफरोज शहा यांना गुरुवारी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास हे घरटे किनाऱ्यावर आढळून आले. सकाळी किनाऱ्यावर स्वच्छतेच्या कामासाठी गेल्यावर कार्यकर्त्यांना कासवाची पिल्ले आढळल्याची माहिती दिली. त्यानुसार निरीक्षण केले असता कासवाच्या मोठय़ा घरटय़ामध्ये पिल्ले आढळल्याची माहिती शहा यांनी दिली. त्यानंतर गतवर्षी सागरी परिसंस्थेतील जीवांच्या बचावासाठी तयार करण्यात आलेल्या ‘मरिन रिसपोण्डण्ट’ या गटातील कार्यकर्त्यांना पाचारण करण्यात आले. त्यानंतर तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या सल्ल्यानुसार वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली ८० पिल्लांना समुद्रात सोडल्याची माहिती या गटातील शौनक मोदी यांनी दिली. मुंबईच्या किनाऱ्यांवर मोठय़ा कालावधीनंतर कासवाचे घरटे आढळल्याने येत्या आठवडाभर वर्सोवा किनाऱ्यावर निरीक्षण करणार असल्याची माहिती कांदळवन संरक्षण विभागाचे पश्चिम परिक्षेत्र अधिकारी प्रशांत देशमुख यांनी दिली. तसेच स्थानिक मच्छीमारांना देखील किनाऱ्याजवळ मासेमारी न करण्याचे आदेश देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. उपचार केंद्राची मागणी मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यांवर वाहून येणाऱ्या जखमी किंवा मृत्य सागरी जीवांच्या उपचारासाठी आणि शवविच्छेदनासाठी किनाऱ्यांवरच सागरी जीव उपचार केंद्र उभारण्याची मागणी यानिमित्ताने करण्यात आली आहे. सागरी जीवांच्या उपचारासाठी मुंबईत वन विभागाचे स्वंतत्र केंद्र अस्तिवात नाही. वन विभागाच्या कांदळवन कक्षातर्फे जुहू किनाऱ्यावर अशा प्रकारचे केंद्र उभारण्याचा प्रस्ताव आहे. मात्र त्याच्या कामाबाबत अजूनही कोणतीही प्रगती नाही. त्यामुळे पावसाळ्याआधी वर्सोवा किनाऱ्यावर उपचार केंद्र उभारण्याची मागणी अफरोज शहा यांनी केली.