मालाड, माझगावची हवा अत्यंत वाईट; अतिसूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण तिप्पट

पावसाचे चार महिने सुखात काढल्यानंतर आता मुंबईकरांना पुन्हा एकदा त्यांनीच पसरवलेल्या प्रदूषणाच्या जाळ्यात अडकावे लागणार आहे. त्याचे पहिले चिन्ह दिसू लागले असून जूननंतर पहिल्यांदाच शहरातील दोन उपनगरांत हवेची प्रतवारी अत्यंत वाईट पातळीवर पोहोचली आहे. दसऱ्याला रावण जाळण्यापूर्वीच दुपारी मालाड व माझगाव येथे हवेतील अतिसूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण सुरक्षित पातळीपेक्षा तिपटीने वाढले होते. प्रदूषणातील या वाढीचे नेमके कारण समजू शकले नसले तरी दिवसभर वारा पडल्याने प्रदूषण एकाच जागी साठून राहिले.

mv01केंद्रीय हवामानशास्त्र विभाग आणि इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ ट्रॉपिकल मिटीओरोलॉजी (आयआयटीएम, पुणे) यांनी संयुक्तरीत्या सुरू केलेल्या ‘सफर’ या हवेची प्रतवारी दर्शवणाऱ्या संकेतस्थळावर मुंबईतील मालाड आणि माझगाव परिसरातील हवेची प्रतवारी बिघडल्याचे दिसून आले. हवेची प्रतवारी ० ते ५०० या प्रमाणात मोजली जाते. १०० पेक्षा कमी प्रदूषण असलेले भाग सुरक्षित समजले जातात. मात्र मालाड भागात हवेची प्रतवारी ३३९ व माझगाव भागात ३१२ पर्यंत गेली होती. चार दिवसांपूर्वी ती अनुक्रमे ६२ आणि ४३ इतकी खाली होती. स्थानिक पातळीवरील प्रदूषण वाढीचे नेमके कारण समजलेले नाही, मात्र हवेचा प्रवाह थांबल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचे सांगण्यात आले.

पावसाळ्यात समुद्रकिनाऱ्याजवळ वाहणाऱ्या सोसाटय़ाच्या वाऱ्याचा वेग हा ताशी ६० ते ७० किमी इतका असतो, तर मुंबईत संध्याकाळी सुटणाऱ्या हवेच्या प्रवाहाचा वेग हा ताशी २० ते ३० किमी इतका असतो. मात्र गेल्या दोन दिवसांपासून शहरातील वारा पडला असून माझगावमध्ये तर मंगळवारी दुपारी हवेच्या प्रवाहाचा वेग ताशी ०.२५२ किमी इतका खाली आला होता. मालाडमध्येही हा वेग अवघा ताशी १ किमी होता. समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या वरळीसारख्या भागात हा वेग ताशी ५ किमी होता. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील पाऊस थांबला असून वाऱ्याचा वेगही खूप कमी आहे. त्यामुळे काही उपनगरात प्रदूषणाची पातळी वाढली आहे. मात्र वाऱ्याचा वेग वाढल्यावर ही परिस्थिती सुधारेल, असे सफरचे प्रकल्प संचालक डॉ. गुफरान बैग यांनी सांगितले.