महामंडळाच्या घटना दुरुस्ती समितीपुढे सूचना दाखल; घटक संस्थांची सहमती आवश्यक अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कार्य अधिक व्यापक करण्यासाठी आणि संमेलनाध्यक्ष निवडणुकीत आणखी मतदार जोडून घेण्यासाठी ‘सहयोगी संस्था’ अशी नवी वर्गवारी करण्याची सूचना महामंडळाच्या घटना दुरुस्तीसमितीसमोर आली असल्याची माहिती महामंडळाच्या सूत्रांकडून देण्यात आली. सध्या महामंडळात महाराष्ट्र साहित्य परिषद (पुणे), मुंबई मराठी साहित्य संघ (मुंबई), विदर्भ साहित्य संघ (नागपूर) आणि मराठवाडा साहित्य परिषद (मराठवाडा) या चार घटक संस्था आहेत. तर गोमंतक मराठी साहित्य सेवक मंडळ-गोवा, कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषद (गुलबर्गा) मराठी साहित्य परिषद-तेलंगणा राज्य, छत्तीसगढ मराठी साहित्य परिषद (छत्तीसगड) आणि मध्य प्रदेश मराठी साहित्य संघ (भोपाळ) या समाविष्ट संस्था तर मराठी वाङ्मय परिषद (बडोदा) ही एक संलग्न संस्था आहे. महामंडळाच्या घटक संस्थांचे प्रत्येकी १७५, समाविष्ट संस्थांचे प्रत्येकी ५०, संलग्न संस्थेचे प्रत्येकी ११, निमंत्रक संस्थेचे ८५, संमेलनाचे पूर्वाध्यक्ष, विश्वस्त असे सुमारे १ हजार ७० मतदार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष निवडून देतात. महामंडळाच्या उद्दिष्टांनुसार साहित्य क्षेत्रात २५ वर्षांहून अधिक काळ काम करणाऱ्या संस्थानी महामंडळात सामील होण्याची इच्छा व्यक्त केली आणि या संस्था ज्या कार्यक्षेत्रात काम करतात त्या विभागातील घटक संस्थांची जर याला काही हरकत नसेल तर त्या संस्थांना ‘सहयोगी संस्था’ म्हणून महामंडळात सामावून घ्यावे, अशी घटना दुरस्ती विदर्भ साहित्य संघाने सुचविली असल्याचे सूत्रांनी सांगितले. संस्थांना फायदा ही सूचना मान्य झाली तर मराठी साहित्यात वर्षांनुवर्षे काम करणाऱ्या महाराष्ट्रासह बृहन्महाराष्ट्रातील काही संस्थांना त्याचा फायदा होणार आहे. अशा काही संस्थांना साहित्य महामंडळाशी जोडून घेता आले तर महामंडळाचे काम अधिक विस्तारायला आणि संमेलनाध्यक्ष निवडणुकीतही मतदारांची संख्या काही प्रमाणात वाढण्यास मदत होणार आहे. त्यामुळे विदर्भ साहित्य संघाने सुचविलेल्या या दुरुस्तीवर महामंडळाच्या विशेष बैठकीत सर्वानी सहमती द्यावी, अशी अपेक्षाही सूत्रांनी व्यक्त केली. साहित्य महामंडळ व्यापक व्हावे आणि महामंडळाच्या उद्दिष्टांशी पूरक असे किमान २५ वर्षे कार्य केलेल्या संस्थांना ‘सहयोगी संस्था’ म्हणून सामावून घेण्याची नवी वर्गवारी महामंडळाच्या घटना दुरुस्तीसमोर आली आहे. घटना दुरुस्ती समितीने ती स्वीकारली असली तरी घटक संस्थांची सहमती असल्याशिवाय ही घटना दुरुस्ती शक्य होणार नाही. या संबंधातील कामकाज अद्याप पूर्ण व्हायचे आहे. - डॉ. श्रीपाद जोशी, अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ