सरसकट सर्व महिलांना उद्यापासून लोकल प्रवासासाठी संमती देण्यात आली आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी ही घोषणा ट्विटरवरुन माहिती देत केली आहे. उद्यापासून सर्व महिलांना सकाळी ११ ते दुपारी ३ आणि संध्याकाळी ७ नंतर मुंबई लोकल सुरु असेपर्यंत ट्रेनमधून प्रवास कऱण्याची संमती देण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या पत्रानुसार आम्ही त्वरित परवानगी देत आहोत असंही त्यांनी म्हटलं आहे.

महिलांना लोकलचा प्रवास करु द्यावा यासाठी राज्य सरकारने पुन्हा एकदा रेल्वे बोर्डाला पत्र लिहिलं आहे. नवरात्रीच्या एक दिवस आधी म्हणजेच शुक्रवारी राज्य सरकारने सरसकट सगळ्या महिलांना लोकल प्रवासाला संमती दिल्याचं म्हटलं होतं. मात्र रेल्वे बोर्डाने यासंदर्भातली संमती नाकारली होती. मुंबई आणि उपनगरांमधून प्रवास करणाऱ्या महिलांच्या प्रवासाचा पेच सुटला असं वाटत असतानाच तो जैसे थेच राहिला. अशात आता राज्य सरकारने पुन्हा एकदा रेल्वे बोर्डाला विनंती करणारं पत्र आज पाठवलं.  त्याची मात्र दखल रेल्वेमंत्र्यांनी घेतलेली दिसत असून महिलांना राज्य सरकारनं मागणी केल्याप्रमाणे लोकल प्रवासास मुभा देण्यात आली आहे.

१६ ऑक्टोबर रोजी राज्य सरकारने यासंदर्भातला आदेश काढला होता. मात्र रेल्वे बोर्डाने नाही म्हटलं होतं त्यामुळे महिलांना लोकल प्रवास कधीपासून करता येणार? याचं उत्तर मिळत नव्हतं ते आता रेल्वेमंत्र्यांनी दिलं आहे. उद्यापासून म्हणजेच २१ ऑक्टोबरपासून मुंबई आणि उपनगरांमधील सर्व महिलांना लोकल ट्रेनने प्रवास करण्याची संमती देण्यात आली आहे. त्यामुळे लॉकडाउनपासून बंद असलेल्या ट्रेन आणि त्यानंतर फक्त अत्यावश्यक सेवेतेल्या लोकांसाठी सुरु झालेल्या ट्रेन्सचे दरवाजे आता सरसकट सर्व महिलांसाठीही खुले झाले आहेत.