राज्यातील बाधित रुग्णांची प्रकृती स्थिर – मुख्यमंत्री

मुंबई : राज्यामध्ये आढळून आलेल्या करोनाच्या रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. करोनाच्या मुकाबल्यासाठी आरोग्य विभागासह सर्व यंत्रणा सज्ज असून नागरिकांनी भीती बाळगण्याची आवश्यकता नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी सांगितले.

करोनाला अटकाव करण्यासाठी विमानतळ, बंदरे, रेल्वे येथेही आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे. रुग्णालयांमध्ये स्वतंत्र विभाग तयार करण्यात आले असून नागरिकांनी सामूहिक कार्यक्रमांना गर्दी करणे टाळावे, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत.

करोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी विधानभवनात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री ठाकरे बोलत होते. या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री राजेंद्र पाटील, माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, रेल्वे, बंदरे, विमानतळ प्राधिकरण, खासगी रुग्णालयातील विशेषज्ञ, विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

या वेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पुणे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याशी संवाद साधून पुणे येथील परिस्थितीबाबत माहिती घेतली. पुणे येथील नायडू रुग्णालयात विलगीकरणाची सुविधा असून गरज पडल्यास पिंपरी चिंचवड येथील नवीन रुग्णालयात देखील विलगीकरणाची सुविधा करावी. व्हेंटीलेटर्सची उपलब्धता ठेवावी, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. उपचारासाठी आवश्यक असणारी कुठलीही बाब, उपकरणाची आवश्यकता भासल्यास त्याची खरेदी जिल्हा नियोजन खर्चातून करावी, माध्यमांना दररोज माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घ्या, असे निर्देश उपमुख्यमंत्री पवार यांनी या वेळी दिले.

जनजागृतीवर भर देण्याची सूचना

केंद्र सरकारने नोव्हेल करोना व्हायरस (कोविड-१९) प्रतिबंधाबाबत करावयाच्या उपाययोजना प्रसिद्ध केल्या असून त्यानुसार कार्यवाही करण्याची जबाबदारी विभागीय आयुक्त यांना देण्यात आले आहे. यासाठी जिल्हाधिकारी, आरोग्य विभाग व इतर आवश्यक विभागांशी समन्वय साधून ही कार्यवाही करावी असेही उद्धव यांनी सांगितले. कोविड-१९ या आजाराबाबत जनजागृती व आरोग्य शिक्षण देण्यासाठी तसेच हात स्वच्छ धुणे, खोकताना- शिंकताना घ्यावयाची काळजी, खोकणाऱ्या, शिंकणाऱ्या व्यक्तीपासून तीन फूट अंतर ठेवणे अशा महत्त्वाचे संदेश देण्यासाठी जनजागृती करण्यासाठी बस स्टँड, एसटी पॅनल, फलक, दूरदर्शन, रेडिओ अशा विविध माध्यमांचा प्रभावीपणे वापर करावा. करोना चाचणी सकारात्मक आलेल्या व्यक्तींच्या संपर्कातील जास्त जोखमीच्या व्यक्तींची चाचणी करावी तसेच कमी जोखमीच्या व्यक्तींना १४ दिवस घरीच थांबण्यास सांगावे. अशा व्यक्तींच्या  घराभोवतालच्या ३ किमी अंतरातील सर्वाची आरोग्य तपासणी करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.