मुंबईचे भूरचनाशास्त्र

‘बॅक बे’चा परिसर हा मुंबईतील सर्वात मोठा ४ किलोमीटरचा ‘सी’ आकाराचा पट्टा आहे. याला आपण ‘राणीचा रत्नहार’ म्हणून ओळखतो. याशिवाय हाजीअली आणि दोन किलोमीटर्सचा माहीम ‘बे’ हा मुंबईचा महत्त्वाचा भाग आहे. हाजीअलीचा दर्गा हाजीअली ‘बे’च्या मध्यभागी वसलेला आहे.

आज दक्षिण मुंबई म्हणून ओळखला जाणारा परिसर हा सात बेटांना जोडून तयार झाला आहे. या बेटांदरम्यान असलेला खाडीचा भाग भोवतालच्या टेकडय़ांची खडी करून भराव घालून बुजविण्यात आला. त्यानंतर खऱ्या अर्थाने मुंबईच्या विकास पर्वाला सुरुवात झाली. शहरातील लोकवस्ती वाढत गेली, तसतशी अनेक सोयीसुविधांची गरज भासू लागली. बशीच्या आकाराच्या या मुंबईमध्ये पावसाचे पाणी साचून राहण्याचे प्रमाण वाढले (कारण लोअर परळ हा सरासरीपेक्षा खालच्या पातळीवर असलेला जमिनीचा भाग) हे पाणी समुद्रात नेऊन सोडण्यासाठी तसेच शहरातील सांडपाणीही शहरापासून दूर समुद्रात नेऊन सोडणे अशा दोन्हींसाठी वाहिनी टाकण्याची आवश्यकता होती. या निचरा करणाऱ्या वाहिनीचे काम सुरू झाले त्यावेळेस भूगर्भतज्ज्ञ आणि अभियंत्यांना असे लक्षात आले की, वरळीच्या या भागामध्ये (लव्ह ग्रूव्ह परिसर) गाळाच्या खडकाचा थर समुद्रात खोलवर भूपृष्ठाखाली शेकडो मीटर्स आतपर्यंत आहे. या थरांमध्ये ज्वालामुखींमधून उसळलेली राख (टुफ) आणि काळा शेलचा खडक  म्हणजेच चिखलाचे खडक आहेत. यातील काळ्या शेलच्या खडकामध्येच पहिले मुंबईकर असलेल्या कासव, बेडूक, मासे व पाणवनस्पतींचे जीवाश्म सापडले आहेत. अभ्यासकांना असेही लक्षात आले की, वरळीप्रमाणेच मलबार हिल, माहीम, वांद्रे, अंधेरी आणि जोगेश्वरी इथे अशाच प्रकारे गाळाचे खडक आढळतात. हे खडक ठिसूळ असल्यामुळे समुद्रातील लाटांच्या सातत्यपूर्ण हालचालींमुळे त्यांची सहजगत्या धूप होते. त्यातून बॅक बे, हाजीअली बे, माहीम बे यांची निर्मिती झाली. हे सारे ‘बे’ इंग्रजी ‘सी’ आकाराचे आहेत. तिन्ही बाजूंनी असलेली जमीन आणि मध्यभागी मोठय़ा प्रमाणावर धूप झालेला जमिनीचा समुद्राखाली गेलेला भाग अशी ही रचना असते. यातील ‘बॅक बे’चा परिसर हा मुंबईतील सर्वात मोठा ४ किलोमीटरचा ‘सी’ आकाराचा पट्टा आहे. याला आपण ‘राणीचा रत्नहार’ म्हणून ओळखतो. याशिवाय हाजीअली आणि दोन किलोमीटर्सचा माहीम ‘बे’ हा मुंबईचा महत्त्वाचा भाग आहे. हाजीअलीचा दर्गा हाजीअली ‘बे’च्या मध्यभागी वसलेला आहे.

आपल्याला आज नजरेस पडणारी मुंबई ही गेल्या काही लाख वर्षांमध्ये तयार झालेली भूरचना आहे. त्यामध्ये विविध कालखंडांचा परिणाम पाहायला मिळतो. त्यात उष्ण आणि शीत कालखंड यांचा समावेश होतो. मुंबई परिसरात समुद्राची पातळी उष्ण कालखंडात अधिक होती त्यावेळेस आज अनेक ठिकाणी किनारा म्हणून दिसणारी जमीन पाण्याखाली गेलेली होती. समुद्रातील वाळूचे थरच्या थर त्यावेळेस या जमिनीवर एकावर एक चढत गेले. कालांतराने समुद्रपातळी पुन्हा एकदा खाली गेली, त्यावेळेस वाळूच्या थरांचा हा जमिनीचा भाग उघडा पडला. असे उंचावलेले किनारे आजही मुंबईत पाहायला मिळतात. हे केवळ मुंबईपुरते मर्यादित नाही तर देशाच्या किनारपट्टीवर अनेक ठिकाणी हे असे झालेले पाहायला मिळते. मुंबईपुरतेच बोलायचे तर मढ, अक्सा, मार्वे, मनोरी आणि गोराई येथे अशी किनारपट्टी पाहायला मिळते. म्हणूनच अनेकदा या किनाऱ्यांना धोकादायक किनारे’ असेही म्हटले जाते. इथे समुद्राच्या लाटांच्या वेगासोबत किनाऱ्यावरची वाळू वेगात पायाखालून निसटते, जमीन अतिशय भूसभूशीत आहे आणि म्हणूनच या किनारपट्टीवर आजपर्यंत सर्वाधिक बळी समुद्रात बुडून गेले आहेत. जवळच असलेल्या भारतीय नौदलाच्या ‘आयएनएस हमला’ या तळाच्या बाहेर आजवर बळी गेलेल्यांचा आकडा मोठय़ा फलकावर लावण्यात आला आहे. खरे तर मुंबईकरांना धोक्याची सूचना देणारा असा हा इशारेवजा फलकच आहे. त्यामुळे या किनारपट्टीवर जाणार असाल तर भूरचना समजून घ्या, ती महत्त्वाची आहे. भूगर्भतज्ज्ञ डॉ. रोहिंग्टन आवासिया सांगतात, मढ आणि अक्सा येथील या किनाऱ्यांची कार्बन फोर्टीन पद्धतीने कालनिश्चिती करण्यात आली असून त्यांची निर्मिती चार हजार वर्षांपूर्वीची आहे. तर उर्वरित किनाऱ्यांची निर्मिती ही अवघ्या अडीच हजार वर्षांची आहे!

विनायक परब  @vinayakparab

vinayak.parab@expressindia.com

(भूशास्त्रीय कालगणना पद्धती ही अब्जांमध्ये मोजली जाते म्हणून इथे अडीच हजार वर्षांसाठी अवघ्या असा शब्दप्रयोग केला आहे.)