सेक्युलर मूव्हमेंटच्या मेळाव्यात चर्चा महाराष्ट्रातील काही पुरोगामी विचारवंतांनी वैदिक हिंदू आणि बहुजन हिंदू अशी मांडणी केल्यामुळे जातीअंताची आग्रही भूमिका घेणाऱ्या फुले-आंबेडकरी चळवळीची कोंडी झाली आहे, अशी चर्चा सेक्युलर मूव्हमेंट संघटनेच्या कार्यकर्ता मेळाव्यात करण्यात आली. सध्याच्या अस्वस्थ वातावरणात आंबेडकरी चळवळीने तात्त्विक आणि भौतिक प्रश्नावर एकाच वेळी लढा उभारण्याचा निर्धार या वेळी व्यक्त करण्यात आला. केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आल्यानंतर, दलित, आदिवासी, अल्पसंख्याक, सर्व समाज घटकामधील गरीब, असा मोठा वर्ग अस्वस्थ आहे. त्याच्या जगण्या-मरण्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले जात आहे. शासन आणि शिक्षणात धार्मिक हस्तक्षेप वाढलेला आहे. दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर व्यवस्थेला कुणी प्रश्न विचारायचा की नाही, अशी भीतिदायक वातावरण तयार झाले आहे. या पाश्र्वभूमीवर सेक्युलर मूव्हमेंटच्या वतीने रविवारी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात अस्वस्थ भारतीय वर्तमान आणि फुले-आंबेडकरी चळवळीची भूमिका या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या विषयावरची मुख्य मांडणी संघटनेचे प्रमुख प्रा. गौतमीपुत्र कांबळे यांनी केली. अध्यक्षस्थानी पद्माकर धेनक होते. चर्चासत्रात अरुण केदारे, अरविंद निकाळजे, आदी ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी भाग घेतला. आंबेडकरी चळवळ सध्या डाव्या व उजव्यांच्या कचाटय़ात अडकली आहे. डावे आता जातीच्या अंताची भाषा बोलू लागले आहेत, ही स्वागतार्ह बाब आहे, परंतु त्या पुढे ते अजून जात नाहीत. जातीला मंजुरी देणाऱ्या धर्मव्यवस्थेच्या विरोधात अजून त्यांचा सूर निघत नाही. उजवे त्यांच्या सोयीचा आंबेडकर मांडत आहेत. तर आता गांधी, मार्क्स, आंबेडकर अशी नवीन जुळवाजुळव केली जात आहे. राज्यातील काही पुरोगामी विचारवंतांनी वैदिक हिंदू व बहुजन हिंदू अशी मांडणी करायला सुरुवात केली आहे. मात्र त्यातील भेदरेषा ते स्पष्ट करीत नाही, त्यामुळे जाती अंताची भूमिका घेणाऱ्या आंबेडकरी चळवळीची कोंडी झाली आहे. जर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत हे हिंदू राष्ट्र आहे असे घोषित केले, तर बहुजन हिंदुत्ववाद्यांची त्यावर काय भूमिका असणार आहे, असा सवाल प्रा. कांबळे यांनी केला. आंबेडकरी चळवळीत सध्या सार्वत्रिक अविश्वासाचे वातावरण आहे. सत्तेचे लाभार्थी स्वस्थ बसले आहेत. जे अस्वस्थ आहेत, ते हतबल आहेत. ज्यांना काही करायचे आहे, त्यांची दिशा चुकलेली आहे. अशा वातावरणात समविचारी संघटनांनी एकत्र येऊन सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय लढाई लढण्यासाठी सज्ज झाले पाहिजे, असे आवाहन या चर्चासत्रात करण्यात आले.