मुंबईतील गिरगाव चौपाटीवर ‘मेक इन इंडिया सप्ताह’ अंतर्गत रविवारी रात्री आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमादरम्यान मंचावर भीषण आग लागली. कार्यक्रमाच्या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अमिताभ बच्चन आणि आमिर खानसह राजकीय तसेच चित्रपट क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. ‘मेक इन इंडिया सप्ताह’ कार्यक्रमादरम्यान झालेल्या दुर्घटनेविषयी अमिताभ बच्चन यांनी आपल्या फेसबुक पेजवर शोक प्रकट केला आहे. ‘जीवनाचा प्रवास ना कोणी समजू शकले आणि ना कोणाला सोडवता आला’, अशा शब्दात भावना व्यक्त करत दुर्घटनेतून सुखरूप बाहेर पडल्याबद्दल स्वत:ला भाग्यशाली म्हटले आहे. फेसबुकवरील संदेशात ते म्हणतात, ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमात महाराष्ट्राचे गौरव गान गाऊन मंचावरून खाली उतरलो आणि थोड्याच वेळात मंचाला आग लागली… खूप वाईट वाटले… नशिबाने वाचलो. ते पुढे लिहितात, जीवनाचा प्रवास ना कोणी समजू शकले आणि ना कोणाला सोडवता आला… केव्हा, कशासाठी, कशाप्रकारे आणि कोणत्या ठिकाणी काय घडणार आहे ते परमेश्वरच जाणो.