लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रियंका गांधी यांनी राजकारणात प्रवेश केल्यानंतर भाजपाकडून टीका होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मात्र वेगळं मत नोंदवलं आहे. प्रियंका गांधी यांच्या राजकारण प्रवेशाचं स्वागत आहे असं त्या म्हटल्या आहेत. त्यांनी प्रियंका गांधींना शुभेच्छाही दिल्या आहेत. बुधवारीच काँग्रेसने प्रियंका गांधी यांच्या राजकारण प्रवेशाची घोषणा केली. ही घोषणा सगळ्यांसाठीच आश्चर्याचा धक्का होती. प्रियंका गांधींना सरचिटणीस पद देण्यात आलं आहे. पूर्व उत्तरप्रदेशच्या त्या प्रभारी असणार आहेत. प्रियंका यांच्या थेट प्रवेशामुळे आता एरवी पडद्यामागून राहुल गांधींना सहकार्य करणाऱ्या प्रियंका समोर आल्या आहेत. भाजपाकडून गांधी घरण्यावर आरोप होत असताना अमृता फडणवीस यांनी मात्र अगदी वेगळं मत नोंदवलं आहे. कुठल्याही महिलेने राजकारणात प्रवेश करणं हे सगळ्या महिलांच्या हिताचं असतं. प्रियंका गांधी यांना राजकारणात का आणलं हा काँग्रेसचा प्रश्न आहे. मात्र मी प्रियंका गांधी यांना राजकारणासाठी शुभेच्छा देते असं अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे. त्याचप्रमाणे प्रियंका गांधी राजकारणात सक्रिय झाल्या असल्या तरीही भाजपावर त्याचा काहीही परिणाम होणार नाही असंही अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे. भाजपासाठी ही काही फार मोठी घटना नाही. उत्तर प्रदेशातील रायबरेली आणि अमेठी अशा दोन जागा काँग्रेसने जिंकणं हा भाजपासाठी धक्का नाही असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे. प्रियंका गांधी यांच्यात इंदिरा गांधी यांची छबी लोक पहातात, त्यामुळे त्यांना आणून काँग्रेसने हुकमी एक्का बाहेर काढला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे, असतानाच अमृता फडणवीस यांनी मात्र प्रियंका गांधी यांचं राजकारणात स्वागत केलं आहे. न्यूज १८ लोकमत या वृत्तवाहिनीशी बोलताना अमृता फडणवीस यांनी प्रियंका गांधी यांचं स्वागत केलं आहे.