अंधेरीत रेल्वे रुळावर गोखले पूलाचा काही भाग कोसळल्यामुळे सकाळपासून बांद्रा ते अंधेरी दरम्यान ठप्प झालेली रेल्वे वाहतूक हळूहळू पूर्ववत होत आहे. दुर्घटनेनंतर तब्बल १२ तासांनी रात्री आठच्या सुमारास अंधेरीहून-चर्चगेटच्या दिशेने अप जलद मार्गावर पहिली लोकल रवाना झाली. त्यानंतर आता डाऊन धीम्या मार्गावर चर्चगेट ते अंधेरी दरम्यान लोकल सेवा सुरु झाली आहे. साडेदहाच्या सुमारास ही धीमा मार्ग खुला झाला. लवकरच अंधेरी ते चर्चगेट दरम्यान अप धीमा मार्गही वाहतूकीसाठी खुला होईल असे पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले आहे. अंधेरीत रेल्वे रुळावरुन ढिगारा हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. मंगळवारी सकाळी साडेसातच्या सुमारास अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा गोखले पूलाचा काही भाग रेल्वे रुळावर कोसळल्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प झाली होती. काहीवेळाने बांद्रा ते चर्चगेट आणि विरार ते गोरेगावपर्यंत लोकल सेवा सुरु करण्यात आली. पण बांद्रयाच्या पुढे अंधेरीपर्यंत लोकल सेवा बंदच होती. आता पश्चिम रेल्वेच्या हार्बर, जलद आणि डाऊन धीम्या मार्गावरील वाहतूक सुरु झाली आहे. हार्बर रेल्वेवरील अंधेरी- सीएसटीएम सेवा दुपारी सव्वा दोन वाजता पूर्ववत झाली. अप आणि डाऊन अशा दोन्ही मार्गांवरील सेवा पूर्ववत झाली. अंधेरीत पादचारी पूल कोसळून झालेल्या या दुर्घटनेत पाचजण जखमी झाले आहेत. Down slow line between Andheri & Vile Parle opened at 22.25 hrs after completion of restoration work. Now Harbour lines, fast lines & down slow line are operational between Andheri and Vile Parle. UP slow line expected to be opened soon. #WRUpdates pic.twitter.com/w2tP5OGUvm — Western Railway (@WesternRly) July 3, 2018 मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे टळला अनर्थ अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या पुलाचा काही भाग रेल्वे रुळांवर कोसळल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक मंगळवारी सकाळी ठप्प झाली. या दुर्घटनेच्या वेळी मोटरमनने प्रसंगावधान दाखवत इमर्जन्सी ब्रेक मारल्याने मोठा अनर्थ टळला आहे. मोटरमनने प्रसंगावधान दाखवले नसते तर पुलाचा काही भाग थेट ट्रेनवरच कोसळला असता. मंगळवारी सकाळी साडे सातच्या सुमारास अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाचा काही भाग रेल्वे रुळांवर कोसळला. यामुळे पश्चिम रेल्वेवरील वाहतूक ठप्प झाली. ही दुर्घटना घडली त्यावेळी तिथून काही अंतरावरच लोकल ट्रेन होती. ही लोकल ट्रेन बोरिवलीवरुन चर्चगेटच्या दिशेने जात होती. मोटरमन चंद्रशेखर सावंत यांना पुलाचा काही भाग कोसळत असल्याचे लक्षात येताच त्यांनी इमर्जन्सी ब्रेक दाबला. यामुळे मोठा अनर्थ टळला.