१५ डब्यांची लोकल सोडण्यासाठी यंत्रणा सज्ज

मुंबई : अंधेरी ते विरार दरम्यानच्या १५ डब्याच्या धीम्या लोकल सोडण्यासाठी आवश्यक असलेली संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे. मात्र करोनामुळे सध्या सामान्य प्रवाशांच्या लोकल प्रवासाला मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे वाढीव धीम्या लोकल फे ऱ्यांचा दिलासा तूर्तास तरी मिळणार नसल्याचे पश्चिम रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले.

पश्चिम रेल्वेच्या अंधेरी, बोरिवली, भाईंदर, मीरा रोड, विरारसारख्या स्थानकात प्रवासी संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे सकाळी व सायंकाळी गर्दीतील प्रवास जीवघेणाच बनत आहे. हा प्रवास सुकर करण्यासाठी अंधेरी ते विरार दरम्यान धिम्या मार्गावरही १५ डबा लोकल चालविण्याचे नियोजन साधारण तीन वर्षांपूर्वी करण्यात आले होते. या  प्रकल्पासाठी ५९ कोटी ५६ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती. फलाटांची लांबी वाढवणे, रेल्वे यार्ड, रूळ, ओव्हरहेड वायर अशी अनेक तांत्रिक कामे पूर्ण करण्यात आली आहेत. गेल्या वर्षी करोनाकाळात मनुष्यबळाअभावी या कामांना काहीसा ब्रेक लागला होता. परंतु पावसाळ्यानंतर पुन्हा कामाला गती दिली गेली. जानेवारी २०२१ आणि त्यानंतर मार्च २०२१ पासून या मार्गावर वाढीव १५ म्डबा लोकल फे ऱ्या चालवण्याचे नियोजनही करण्यात आले. मात्र करोना रुग्णांची संख्या पुन्हा झपाटय़ाने वाढत असल्याने राज्य सरकारने घातलेल्या निर्बंधामुळे पंधरा डब्यांच्या नवीन फे ऱ्या सध्या तरी चालवणे शक्य नसल्याचे पश्चिम रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. सध्या पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते डहाणू, विरारसाठी १५ डबा जलद लोकल चालविल्या जातात. अंधेरी ते विरार १५ डबा धिम्या लोकल चालविल्यास प्रवाशांना त्याचा फायदा होईल.

‘अंधेरी-विरार या मार्गावर पंधरा डबा लोकल फे ऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळेल. परंतु आता निर्बंध असल्याने आणि अत्यावश्यक सेवांशिवाय अन्य प्रवाशांना प्रवासाची मुभा नसल्याने या वाढीव फे ऱ्या सुरू करून काहीही फायदा नाही. त्याचा नंतरच विचार के ला जाईल.’

सुमित ठाकूर, मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे