भाजपमधील नाराज नेते आमच्या संपर्कात असून एकनाथ खडसे हे असंतोषाचे जनक असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि कॅबिनेट मंत्री जयंत पाटील यांनी इस्लामपूरमध्ये जाहीर सभेत बोलताना केले.

राज्यात सत्ताबदलानंतर मंत्री पाटील यांचे प्रथमच आगमन झाल्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या सत्काराला उत्तर देताना त्यांनी सांगितले की, भाजपमध्ये असंतोष असून त्याचे जनक एकनाथ खडसे आहेत.

पक्षातून बाहेर पडून भाजपात गेलेले पुन्हा आमच्याशी संपर्क साधत असून यशवंतराव  चव्हाण यांनी बेरजेचे राजकारण करण्याचा आदर्श घालून दिला आहे. येत्या काळात शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी राज्यात एक नंबरचा पक्ष असेल असेही त्यांनी यावेळी सांगितले. राणेंची वक्तव्ये मनावर घेऊ नका

ठाकरे सरकार हे स्थगिती सरकार अशी टीका माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केली आहे याचा संदर्भ घेऊन ते म्हणाले की, राणे यांची वक्तव्ये मनावर घेण्यासारखी नसतात. सरकार गतीने काम करीत असल्याचे पाहून राणेच या सरकारचे भविष्यात कौतुक करतील. खातेवाटप हा मुख्यमंत्री ठाकरे यांचा अधिकार असून येत्या दोन दिवसात खातेवाटप होईल असेही त्यांनी सांगितले.