भटक्या प्राण्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या निवारा संस्थेतच प्राण्यांची अक्षम्य हेळसांड झाल्याची घटना ठाणे जिल्ह्य़ात घडली आहे. या संस्थेच्या मालकांच्या निष्काळजीपणामुळे या निवारा संस्थेतील ३० प्राण्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. वज्रेश्वरी येथे नोव्हेंबर महिन्यात ‘हार्ट्स’ या सामाजिक संस्थेने भटक्या प्राण्यांसाठी निवारा केंद्र सुरू केले. वैष्णवी भट्ट आणि श्रेया अॅड्री यांनी या संस्थेची सुरुवात केली होती. याच महिन्यात ‘अवेअर’ फाऊंडेशनच्या जेनी विवीएनी यांनी विश्वस्तांकडून निधी मिळत नसल्यामुळे ग्रँट रोडमधील त्यांच्या निवारा केंद्रातून सुमारे ८० प्राणी वज्रेश्वरीतील ‘हार्ट्स’ या निवारा केंद्रात आणले होते. मात्र प्रवासादरम्यान जेनीने एकाच लहानशा पिंजऱ्यात १० मांजरी ठेवल्यामुळे यातील सहा मांजरींचा गुदमरून जागीच मृत्यू झाला. त्याशिवाय या प्रवासादरम्यान अनेक प्राणी जखमी झाले. प्राण्यांना सांभाळणे शक्य नसल्याने जेनीने या प्राण्यांना वज्रेश्वरीतील निवारा केंद्रात सोडले. मात्र या केंद्रातही प्राण्यांचे अतोनात हाल झाले. या केंद्रात प्राण्यांचा सांभाळ करणारा व्यक्ती मार्चमध्येच निवारा केंद्र सोडून गेला होता. त्यामुळे गेले दोन महिने प्राण्यांची काळजी घेण्यासाठी कोणीही नाही. शिवाय या निवारा केंद्राच्या मालक वैष्णवी भट्ट व श्रेया अँड्री या दहिसर येथे राहत असल्याने आठवडय़ातून एकदा निवारा केंद्रात येतात. नोव्हेंबरमध्ये ‘हार्ट्स’ निवारा केंद्रात ८० प्राणी आले होते. त्यात १२ मांजरी आणि उरलेले भटके श्वान होते. नोव्हेंबर ते डिसेंबर या दरम्यान येथील २४ प्राण्यांचा वातावरणाशी जुळवून घेता न आल्यामुळे आजारी पडून मृत्यू झाला, तर यातील १० ते १२ भटके श्वान पळून गेले आहेत, तर ६ ते ७ प्राणी जखमी झाले आहेत. ३० एप्रिल रोजी ‘पावा’ (पिस फॉर अॅनिमल वेल्फेअर असोसिएशन) या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी वज्रेश्वरीतील निवारा केंद्राला भेट दिली होती. या वेळी येथील प्राणी जखमी अवस्थेत सापडले, तर अनेक श्वान खाण्यासाठी अन्न उपलब्ध नसल्यामुळे माती खात असल्याचे दिसले. नोव्हेंबर ते डिसेंबरदरम्यान मृत्यू झालेल्या ३० प्राण्यांना याच निवारा केंद्रात दफन करण्यात आले आहे, अशी माहिती ‘पावा’ संस्थेचे संस्थापक सलीम चारानिया यांनी दिली, तर प्राण्यांच्या संस्थेत आवश्यक असलेल्या कुठल्याच सुविधा तेथे नसल्याचे चारानिया यांचे म्हणणे आहे. या संस्थेत प्राण्यांची नोंदणी वही, दिवे, स्वच्छ पाणी, अन्न यांची सोय नसल्याचेही त्यांनी सांगितले. याबाबत विचारले असता वैष्णवी यांनी टोलवाटोलवीची उत्तरे देत प्राण्यांच्या मृत्यूसाठी जेनी जबाबदार असल्याचे सांगितले. मात्र जेनीला याबाबत विचारले असता तिने कुठलीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. वज्रेश्वरीतील प्राणी निवारा संस्थेत प्राण्यांची हेळसांड होती. या वेळी येथील प्राणी जखमी अवस्थेत सापडले, तर अनेक श्वान खाण्यासाठी अन्न उपलब्ध नसल्यामुळे माती खात असल्याचे दिसले. नोव्हेंबर ते डिसेंबरदरम्यान मृत्यू झालेल्या ३० प्राण्यांना याच निवारा केंद्रात दफन करण्यात आले आहे, अशी माहिती ‘पावा’ संस्थेचे संस्थापक सलीम चारानिया यांनी दिली, तर प्राण्यांच्या संस्थेत आवश्यक असलेल्या कुठल्याच सुविधा तेथे नसल्याचे चारानिया यांचे म्हणणे आहे. या संस्थेत प्राण्यांची नोंदणी वही, दिवे, स्वच्छ पाणी, अन्न यांची सोय नसल्याचेही त्यांनी सांगितले. याबाबत विचारले असता वैष्णवी यांनी टोलवाटोलवीची उत्तरे देत प्राण्यांच्या मृत्यूसाठी जेनी जबाबदार असल्याचे सांगितले. मात्र जेनीला याबाबत विचारले असता तिने कुठलीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.