मुंबई विद्यापीठात झालेल्या उत्तरपत्रिका घोटाळ्याची चौकशी करणारे पोलीस असल्याचे भासवत अभियंत्याकडे पाच लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या तीन जणांना भांडुप पोलिसांनी सोमवारी अटक केली. तिघांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. न्यायालयात हजर केले असता तिघांनाही १० जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या तिकडीने आणखी कोणाला अशा प्रकारे लुटले आहे का, याचा शोध पोलीस घेत आहेत. या प्रकरणी सोमवार, ७ जून रोजी पोलिसांनी प्रफुल्ल भिंगारदेवे (३८), नीलेश साटम (३८), नीलोफर सोलकर (३२) या तिघांना अटक केली. मुंबई विद्यापीठाच्या अभियांत्रिकी शाखेच्या उत्तरपत्रिकांचा घोटाळा प्रकरणात विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना अटक केली असून विद्यार्थ्यांचीही चौकशी सुरू आहे. यातच दोन वर्षांपूर्वी अभियंता झालेल्या एका २५ वर्षीय तरुणाला तीन जणांना गाठले. आम्ही भांडुप पोलीस ठाण्यातून आलो असून तुम्हीही या घोटाळ्यात सहभागी असल्याचे सांगितले. शनिवार, ४ जून रोजी दोन पुरुष आणि एक महिला या अभियंत्याला भेटले. त्याच्याकडे पाच लाख रुपये मागितले. पूर्ण पैसे दिले तर तुमच्यावर कुठलीही कारवाई होणार नाही, असेही हे तिघे या अभियंत्याला म्हणाले. अभियंत्याने त्यांना विनंती केली असता, तडजोड होऊन दीड लाख रुपयांची रक्कम ठरली. पहिला हप्ता म्हणून अभियंत्याने त्यांना ४० हजार रुपये दिले. या अभियंत्याने घोटाळ्यात चौकशी झालेल्या एका व्यक्तीशी संपर्क साधून पोलीस पाच लाख रुपये मागत असल्याचे सांगितले. मात्र, त्याने पोलिसांशी संपर्क साधण्यास सांगितल्याने प्रकरण स्पष्ट झाले.