देशातील ९१ मतदारसंघांमध्ये अधिसूचना जारी होणार

लोकसभा निवडणुकीची प्रत्यक्ष प्रक्रिया उद्यापासून सुरू होत असून, देशातील ९१ मतदारसंघांमध्ये निवडणुकीची अधिसूचना जारी होणार आहे. राज्यातील सात मतदारसंघांमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे.

लोकसभा निवडणूक सात टप्प्यांत होणार असून, ११ एप्रिलला पहिल्या टप्प्यात मतदान होणार असलेल्या देशातील ९१ मतदारसंघांतील निवडणूक प्रक्रियेची अधिसूचना जारी केली जाईल. १८ ते २५ मार्च या काळात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत असून, २६ तारखेला अर्जाची छाननी केली जाईल. उमेदवारी अर्ज माघार घेण्याची मुदत २८ तारखेपर्यंत आहे. देशातील २० राज्यांमधील ९१ मतदारसंघांमध्ये पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे.

पहिल्या टप्प्यातील निवडणुकीत विदर्भातील सात मतदारसंघांचा समावेश आहे. नागपूर, वर्धा, रामटेक, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर आणि यवतमाळ-वाशिम या सात मतदारसंघांमध्ये ११ एप्रिलला मतदान होणार आहे. या सात मतदारसंघांपैकी भाजप-शिवसेना युतीत पाच मतदारसंघ भाजपकडे, तर दोन मतदारसंघ शिवसेनेकडे आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीत सहा मतदारसंघ हे काँग्रेसच्या वाटय़ाला, तर भंडारा-गोंदिया हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत सातही जागा भाजप-शिवसेना युतीने जिंकल्या होत्या; पण नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर गेल्या वर्षी झालेल्या भंडारा-गोंदिया मतदारसंघातील पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव होऊन राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे हे विजयी झाले होते. या वेळी या मतदारसंघातून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल हे लढणार आहेत.

भाजप आणि शिवसेना युतीत नागपूर, वर्धा, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर हे पाच मतदारसंघ भाजपकडे, तर रामटेक आणि यवतमाळ-वाशिम हे दोन मतदारसंघ युतीत शिवसेनेकडे आहेत.