उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्र्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांची नियुक्ती पुन्हा एकदा वादात सापडली असून या कर्मचाऱ्यांच्या वेतनाची मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशिक्षण विद्यापीठाकडे (बाटू)करण्यात आली आहे.

उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या कार्यालयातील कर्मचारी, विशेष कार्य अधिकारी यांच्या नियुक्तीवरून वाद निर्माण झाला होता. आता पुन्हा एकदा दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती वादात सापडली आहे. मंत्र्यांच्या कार्यालयात लिपिक पदी आणि शिपाईपदी नियुक्ती करण्यात आली. १ जानेवारी रोजी हंगामी पद्धतीने या पदांवर नियुक्ती झाली. मात्र, मंत्रालयाने त्यांचे वेतन बाटूकडे मागितले आहे. ‘कर्मचाऱ्यांचे १ फेब्रुवारीपासून नियुक्तीचे आदेश तात्काळ देण्यात यावेत. त्यांचे वेतन आपल्या विद्यापीठामार्फत हंगामी पद्धतीने देण्यात यावे. अशी मंत्री महोदयांच्या सूचनेनुसार विनंती आहे,’ असे पत्र सामंत यांच्या विशेष कार्य अधिकाऱ्यांनी २५ फेब्रुवारी रोजी विद्यापीठाला दिले आहे.

उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री सातत्याने विद्यापीठाच्या कारभारात हस्तक्षेप करत असून त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा भूर्दंड विद्यापीठांनी का उचलावा, ’ असा प्रशद्ब्रा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने उपस्थित केला आहे.

‘हा प्रक्रियेचा भाग आहे. हे कर्मचारी मंत्रालयातच होते. त्यांना त्याचे वेतन मिळावे हा उद्देश आहे. असे अनेक विभागात उसनवारीवर कर्मचारी घेण्यात येतात. बाटूने काहीही खर्च केलेला नाही. याबाबत विद्यापीठावर कोणताही दबाव आणलेला नाही. आमच्या कार्यालयाने विद्यापीठाला विनंती केली. विद्यापीठाने वेतन दिले नाही तर त्यांचे वेतन मी खासगी खर्चातून करत आहे.’

– उदय सामंत, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री