गुरुदासपूर जिल्ह्यातील दीनानगर हल्ल्याचा तपास अपूर्णच; हल्ल्याच्या शक्यतेची भीती खरी ठरली, संस्थाचे कातडी बचाव धोरण
पाच महिन्यांपूर्वी दिनानगर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तपास अद्यापही अपूर्ण असल्यामुळे अशाच प्रकारचा आणखी एखादा हल्ला होऊ शकतो ही सुरक्षाविषयक तज्ज्ञांची भीती शनिवारी सकाळी पठाणकोट येथील एअरफोर्स स्टेशनवर पाच दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामुळे खरी ठरली आहे.
गुरुदासपूर जिल्ह्य़ातील दिनानगर पोलीस ठाण्यावर २७ जुलै २०१५ रोजी तीन दहशतवाद्यांनी हल्ला चढवला होता. यात एका पोलीस अधीक्षकासह सातजण मारले गेले होते. यावेळी झालेल्या चकमकीत तिन्ही दहशतवादीही मारले गेले होते.
या हल्ल्याचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) सोपवण्यास पंजाब पोलिसांनी नकार दिला होता. मात्र पाच महिने उलटून गेल्यानंतरही त्यांना या हल्ल्याच्या तपासाबाबत कुठलीही प्रगती करण्यात अपयश आलेले आहे. दहशतवादी कोणत्या मार्गाने आले होते हेसुद्धा पंजाब पोलीस निश्चित करू शकलेले नाहीत, या वस्तुस्थितीबाबत सुरक्षा तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. देशाच्या सुरक्षेपेक्षा स्वत:ची कातडी वाचवण्याची काही संस्थांना चिंता असल्याचे मत यावरून तयार झाले आहे.
एका देशावर हल्ला झाला आणि ना हल्लेखोर दहशतवाद्यांची ओळख पटली, ना त्यांचा ठावठिकाणा कळला ही गोष्ट अतिशय धक्कादायक आहे, असे पंजाब पोलिसांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ओळख उघड न करण्याच्या अटीवर ‘इंडियन एक्सप्रेस’शी बोलताना मान्य केले. पंजाब पोलिसांनी या हल्ल्याचा तपास एनआयएकडे सोपवण्याऐवजी त्यांची सर्व शक्ती हा अधिकारक्षेत्राचा मुद्दा बनवण्यात खर्च केली.
पोलिसांनी या हल्ल्याच्या तपासाकरता अन्वेषण ब्यूरोचे संचालक असलेले अतिरिक्त पोलीस महासंचालक सहोटा यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले होते. हे पथक नंतर रोहित चौधरी यांच्याकडे सोपवण्यात आले. जीपीएस उपकरणांनी दहशतवाद्यांचे ‘लोकेशन्स’ वेगवेगळे दाखवल्याचे सहोटा यांनी ‘इंडियन एक्सप्रेस’ला सांगितले; मात्र पंजाब पोलिसांच्या या म्हणण्याशी इतर सुरक्षा संस्थांनी मुळीच सहमती दाखवली नाही.
गेल्याच महिन्यात सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) महानिरीक्षक अनिल पालीवाल यांनी आम्ही संपूर्ण सीमा पिंजून काढली, परंतु दहशतवाद्यांनी पंजाबमधून सीमा पार केल्याचे दाखवणारी कुठलीही चिन्हे आम्हाला दिसली नाहीत. याउलट, दहशतवादी काश्मीर सीमेवरून आले असतील आणि त्या सीमांचे रक्षण करण्याची जबाबदारी सीमा सुरक्षा दलावरच आहे, या आपल्या भूमिकेला पंजाब पोलीस चिकटून आहेत.मार्ग

सहा महिन्यांत पंजाबमध्ये दुसरा हल्ला
१ मार्च २००१- भारत-पाकिस्तान सीमेवर पंजाबमधील गुरुदासपूर जिल्हय़ात १३५ यार्ड लांबीचा भूमिगत बोगदा खणला.
१ जानेवारी २००२- पंजाब-हिमाचल सीमेवर दमताल येथे अज्ञात दहशतवाद्यांचा हल्ला. तीन लष्करी जवान ठार, तर इतर पाच जण जखमी.
३१ जानेवारी २००२- पंजाब वाहतूक मंडळाच्या बसमध्ये होशियारपूर जिल्ह्य़ातील पतरणा येथे स्फोट, दोन ठार तर १२ जण जखमी.
३१ मार्च २००२- लुधियानापासून २० कि.मी. अंतरावर दरोहा येथे फिरोझपूर-धनबाद येथे बॉम्बस्फोटात दोन ठार, इतर २८ जण जखमी.
२८ एप्रिल २००६- जालंधर बस स्थानकावर ४५ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसमध्ये बॉम्बस्फोट, आठ जखमी.
१४ ऑक्टोबर २००७- लुधियानात चित्रपटगृहात बॉम्बस्फोटात दहा वर्षांच्या मुलासह सात ठार.
२७ जुलै २०१५- पंजाब पोलीस अधीक्षकांसह सात जण गुरुदासपूर जिल्ह्य़ातील पोलीस स्टेशनवर हल्ल्यात ठार, सर्व तीन अतिरेक्यांना कंठस्नान.
२ जानेवारी २०१६- पठाणकोट येथे हवाई दलाच्या तळावर दहशतवाद्यांचा हल्ला, चार अतिरेकी ठार, तीन सुरक्षा जवान मृत्युमुखी.

एमआय हेलिकॉप्टरमधून गोळीबार
दहशतवाद्यांवर एमआय हेलिकॉप्टरमधून गोळीबार करण्यात आला. दहशतवादी हवाई दलाच्या तळावर प्रवेश करताना लष्कराच्या टेहळणी यंत्रणेतील दृश्यफितीत दिसले. दहशतवाद्यांनी झुडपांमध्ये लपून हातबॉम्ब फेकले. त्यानंतर भारतीय जवानांनी गोळीबाराने प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली. ज्या भागात दहशतवादी लपल्याचा संशय आहे, त्या भागात विशेष करून नियंत्रण ठेवण्यात आले. कारवाईत काही काळ शांतता आणि त्यानंतर पुन्हा गोळीबाराचे आवाज सुरू झाले. दोन्ही बाजूंनी चकमक सुरू असताना पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल यांनी पठाणकोटला भेट दिला. या वेळी त्यांनी पाकिस्तानने दहशतवाद्यांना आवर घालावा असे स्पष्ट केले.

* गेल्या सहा महिन्यांतील पंजाबमधील हा सहावा हल्ला. गुरुदासपूर जिल्हय़ातील दीनानगर पोलीस ठाण्याच्या इमारतीवर हल्ला.
* हल्ल्याचा इशारा आधीच मिळालेला होता. सायंकाळी सात वाजेपर्यंत गोळीबाराचे आवाज. कारवाईसाठी ‘गरुड दला’तील दोन हेलिकॉप्टर्सचा वापर.
* भारत आणि पाकिस्तान यांच्यात १४ व १५ जानेवारीला होणाऱ्या परराष्ट्र सचिव पातळीवरील बैठकीवर प्रश्नचिन्ह.
दहशतवाद्यांजवळ सापडलेल्या दोन जीपीएस उपकरणांवरून ते पाकिस्तानमधील लष्कर-ए-तोयबाचे असल्याचे दिसून आल्याचे पोलिसांनी पूर्वी सांगितले होते. त्यांनी भारतात शिरण्यासाठी वापरलेला कथित नकाशाही पोलिसांनी दाखवला होता. या उपकरणांच्या ‘रूट को-ऑर्डिनेट्स’नी हे दहशतवादी रावी नदी पार करून पंजाबमधील मकौरा (गुरुदासपूर) येथे आले होते.