विनायक परब vinayak.parab@expressindia.com @vinayakparab साष्टी बेट अर्थात मुंबईचा समावेश इसवी सनाच्या पहिल्या शतकापासूनच उत्तर कोकणात होत होता. अगदी तेव्हापासूनच महाराष्ट्राच्या किनारपट्टीच्या टापूचे उत्तर आणि दक्षिण कोकण असे दोन भाग पडल्याचे आणि स्वतंत्र राज्यकर्ते तिथे राज्य करत असल्याचे ऐतिहासिक पुराव्यांवरून आपल्या लक्षात येते. उत्तर कोकणचे शिलाहार हे राष्ट्रकूटांचे मांडलिक म्हणून या प्रदेशावर राज्य करते झाले. आधी इथे बदामीच्या चालुक्यांचे राज्य होते. या संदर्भातील महत्त्वाचा पुरावा म्हणजे बदामी ऐहोळे येथील शिलालेख. मौर्याची राजधानी असलेल्या राजलक्ष्मी पुरीला शेकडो जहाजांनी वेढा घालून ती मौर्याची राजधानी द्वितीय पुलकेशीने जिंकली. उत्तर कोकणावर त्यापूर्वी राज्य करणारे मौर्य हे कलचुरी राजघराण्याचे मांडलिक राजे म्हणून राज्य करत होते, असे इतिहासकार मानतात. मौर्य घराण्याचा एकमेव शिलालेख ठाणे जिल्ह्य़ातील वाडा येथे सापडला होता. सध्या तो मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात ठेवण्यात आला आहे. मौर्य राजा सुकेतूवर्मन याच्या कालखंडातील या शिलालेखामध्ये एका स्थानिक मंदिराला दिलेल्या दानाचा उल्लेख आहे. द्वितीय पुलकेशीच्या विजयानंतर त्याने उत्तर कोकण आपल्या मोठय़ा साम्राज्याला जोडलेले दिसते. राज्याचा आवाका बराच मोठा म्हणजे आताच्या कर्नाटकापर्यंत पोहोचलेला असल्याने त्याने आपल्या राज्याची दुसरी राजधानी तयार केली. ही दुसरी राजधानी बहुधा नाशिक असावी असे अनेक इतिहासकारांना वाटते. कारण अनेकांनी या राजधानीचे केलेले वर्णन हे नाशिकला जुळणारे आहे. महत्त्वाचे म्हणजे चिनी बौद्ध भिक्खू ह्य़ुआन श्वंग यानेही त्याच्या भेटीमध्ये या राजधानीचे वर्णन लिहून ठेवले आहे. खरेतर पुलकेशीची मूळ राजधानी विजापूर (तत्कालीन वातापिपुरी नगरी) होती. मात्र राज्यकारभाराची सोय म्हणून त्याने दुसरी राजधानी केली असावी. पुलकेशीच्या राज्याची सुरुवात दक्षिण गुजरात ते दक्षिणेस कर्नाटकापर्यंत होती. त्यानंतर उल्लेख सापडतो तो हरिश्चंद्रवंशी स्वामिचंद्र याचा. विक्रमादित्य राजाने त्याला उत्तर कोकणचा अधिपती केल्याचा उल्लेख सापडतो. समग्र कोकणपुरी असा त्याच्या राज्याचा उल्लेख येतो, ज्यामध्ये साष्टीचा समावेश होता. मधल्या कालखंडात एक- दोन राजांचे उल्लेख येतात आणि त्यानंतर मुंबई-ठाण्याच्या संदर्भात थेट उल्लेख येतो तो मंगलरस या राजाचा. तो श्रीस्थानक अर्थात ठाण्याहून राज्य करत होता. त्याचे एकूण तीन ताम्रपट सापडले असून त्यातील एक दक्षिण गुजरात, एक कच्छमधील तर एक ठाणे जिल्ह्य़ातील मनोर येथे सापडलेला आहे. यावरून ठाण्यावरून राज्यकारभार करणाऱ्या या राजाची पोहोच गुजरातेपर्यंत होती हे सहज लक्षात येते. कूळकथेमध्ये आलेल्या संजानच्या उल्लेखानंतर काही वाचकांनी गुजरातमधील हा भाग कशासाठी अशी विचारणा केली होती. गुजरात हे तुलनेने अलीकडे झालेले राज्य आहे. पूर्वी उत्तर कोकणात गुजरातच्या किनारपट्टीचाही समावेश होत होता. मुंबई ते गुजरात असा हा पट्टा होता. त्यामुळे तत्कालीन मुंबईचा विचार करताना राज्य म्हणून उत्तर कोकण ज्यात गुजरातही समाविष्ट आहे, त्याचा विचार करावा लागतोच. हा संदर्भ टाळता येत नाही. मंगलरसाच्या मनोरच्या शिलालेखामध्ये सूर्यमंदिराला दिलेल्या दानाचा उल्लेख आहे. ते दानपत्र इसवी सन ६९१ मधील आहे. मध्यंतरीच्या काळात आणखी एक युद्ध होऊन पुन्हा एकदा उत्तर कोकणचा भाग हा राष्ट्रकूटांच्या दंतुदुर्ग याच्या आधिपत्याखाली आले असावे असे म्हणण्यास पुरता वाव आहे, कारण त्याचा पुरावा म्हणजे मनोर ताम्रपट. त्यामध्ये मनोरजवळ असलेल्या एका देवालयाला त्याने तंबसाहिका नावाचे गाव दान दिल्याचा उल्लेख आहे. त्याचा कारभार पाहण्यासाठी त्याने नेमलेल्या अनिरुद्ध या अधिकाऱ्याचा उल्लेखही त्यामध्ये आहे. वेळोवेळी देवालयांना किंवा त्यांची काळजी वाहणाऱ्या ब्राह्मणास दिलेल्या या दानलेखांमधून तत्कालीन राजवंशांची मिळणारी माहिती आपल्याला तत्कालीन कालखंडातील इतिहासाची पुनर्रचना करण्यास मदतच करते.