अरुण म्हात्रे यांचे आवाहन
‘जागतिकीकरण व माध्यमांच्या रेटय़ामुळे तरुणांसमोर ‘सेलिब्रिटी’पणाचे आकर्षण उभे केले जात असून, तरुण पिढीने याच्या मागे न जाता वंचित- पीडितांसाठी समाजामध्ये चाललेल्या कार्याचा आदर्श घ्यायला हवा,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे यांनी केले.
‘मुंबई मराठी साहित्य संघ’ व ‘रामनिरंजन झुनझुनवाला महाविद्यालय’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या १२व्या ‘महाविद्यालयीन मराठी साहित्य संमेलना’चे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. तरुणाईने समाजातल्या वास्तवावर मोकळेपणाने व अधिक नेमकेपणाने व्यक्त व्हायला हवे,’ असे म्हात्रे यांनी सांगितले. विचारवंतांच्या हत्येचे समर्थन करण्याऱ्या बेफाम वक्तव्यांनी असहिष्णुता निर्माण करण्याचा काही जण प्रयत्न करतात, अशा व्यक्तींचा व वक्तव्यांचा मी निषेध करतो,’ असेही ते म्हणाले. संमेलनाचे उद्घाटन अभिनेत्री स्पृहा जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. राजेंद्र सिंह व प्रा. शुभांगी वर्तक हे संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते. पहिल्या सत्रात ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडे यांची विद्यार्थ्यांनी प्रकट मुलाखत घेतली. ‘ब्रेन ड्रेन- स्वप्न आणि वास्तव’ या विषयावर परिसंवादात होता. यात डॉ. नरेंद्र जाधव, भूषण केळकर, प्रशांत कऱ्हाडे, डॉ. अश्विनी भालेराव-गांधी यांनी सहभाग घेतला. कविसंमेलनही यावेळी पार पडले.