मुंबईमध्ये १३ आणि १४ जून रोजी मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला असला तरी मुंबई महापालिकेच्या वॉर्डमध्ये असणारे नियंत्रण कक्ष (कंट्रोल रूम) तसेच एमएमआरडीए आणि एमएमआरडीसीचे नियंत्रण कक्षांची अद्याप जुळवाजुळवच सुरु आहे. हे नियंत्रण कक्ष पूर्णपणे सज्ज नसल्याचे पहायला मिळत आहे, असं भाजपा आमदार आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. शेलार यांनी आज मुंबईतील या डिझास्टर कंट्रोलरूमची पाहणी केल्यानंतर येथील तयारीसंदर्भात नाराजी व्यक्त केली.

मुंबई महापालिका एकीकडे कोविड रुग्णांच्या रुग्णसेवेत असली तरी या वर्षी मान्सून पूर्वतयारीच्या कामात दुर्लक्ष  होत असल्याचे दिसून येत आहे. शेलार यांनी नुकतीच मुंबईतील नालेसफाईची पाहणी केल्यानंतर यावर्षी केवळ ४० टक्के नालेसफाई झाल्याचे निदर्शनास आले. त्यांनी यासंदर्भातील माहिती संबधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर निसर्ग चक्रीवादळापूर्वी महापालिकेच्या मुख्य नियंत्रण कक्षाला भेट देऊन नियंत्रण कक्ष बेसावध असल्याचेही त्यांनी उघड केले होते. आता पाऊस मुंबईत कधी दाखल होईल यापूर्वीचा अनुभव पाहता ज्याप्रकारे यंत्रणा सुसज्ज ठेवावी लागते त्या पद्धतीने यावर्षी यंत्रणा सज्ज आहे का? हे जाणून घेण्यासाठी शेलार यांनी आज पहाणी केली. या पहाणीदरम्यान अद्याप नियंत्रण कक्षाची जुळवाजुळव सुरु असल्याचे तसेच सर्व यंत्रणा व कनेक्टिव्हिटीने नियंत्रण कक्ष सज्ज नसल्याचे चित्र समोर आल्याचे दिसून आलं आहे.

ज्या एमएमआरडीएचे (महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन) मुख्यमंत्री स्वतः अध्यक्ष आहेत, त्या एमएमआरडीएचा डिजास्टर मॅनेजमेंट रूम केवळ २०० फुटांचा असून एक संगणक, एक दूरध्वनी, या पलीकडे तिथे कोणतीही यंत्रणा उपलब्ध नाही. या कक्षात अधिकारी उपलब्ध नाही, असे चित्र शेलार यांना पहायला मिळालं. आपत्कालीन काळात आवश्यक असणारी व कार्यरत राहणारी तांत्रिक यंत्रणा कोणत्याही स्वरूपात उभी केलीली पाहायला मिळत नसल्याचेही शेलार यांच्या पहाणीमध्ये निदर्शनास आलं.

“एमएसआरडीसीचा जीआर कालच निघाला असून त्यांच्या नियंत्रण कक्षात यंत्रणा तुलनात्मक बरी आहे. मात्र मुंबईतील रस्ते आणि उड्डाणपूल याबाबतची जबाबदारी असणाऱ्या एमएसआरडीएकडे पावसाळ्यामुळे खड्डे पडल्यास संबंधित अभियंत्याला कळल्यानंतर कोणत्या ठिकाणाहून कोल्डमिक्स अथवा हाँटमिक्स उपलब्ध केले जाणार त्यासाठीची वाहतूक यंत्रणा कशी असणार? याबाबत कोणतीही सुसज्जता नियंत्रण कक्षात दिसून येत नाही. दरवर्षी मुंबईला पाऊस, पुराचा फटका, रस्त्यावर पडणारे खड्डे याचा आजवरचा अनुभव पाहता तिन्ही यंत्रणांचे आपत्कालीन कक्ष अद्याप परिपूर्ण सज्ज नाहीत, असे दिसून येत आहे,” असं शेलार यांनी या पहाणीनंतर सांगितलं.