मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केल्यामुळे अभिनेत्री कंगना रणौत आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यात चांगलीच शाब्दिक चकमक सुरु असल्याचं दिसून येत आहे. यामध्येच बेकायदेशीर बांधकाम केल्याप्रकरणी बीएमसीने कंगना रणौतच्या कार्यालयावर कारवाई केली. या घटनेनंतर अनेकांनी बीएमसीवर टीका करत कंगनाला पाठिंबा दिला आहे. यामध्येच अशोक पंडित हेदेखील व्यक्त झाले असून त्यांनी कंगनाची पाठराखण केली आहे. इतकंच नाही तर त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना टोला लगावला आहे. ‘एका स्त्रीने दिलेला शाप महागात पडतो’, असं त्यांनी म्हटलं आहे.

“एक स्वप्न उद्धवस्त झालं. देव तिला आणखी बळ आणि शक्ती देवो. एका स्त्रीचा शाप महागात पडतो संजय राऊतजी”, असं ट्विट अशोक पंडित यांनी केलं आहे. त्यांच्या या ट्विटनंतर एकच खळबळ उडाली असून अनेकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. तर काहींनी त्यांना पाठिंबादेखील दिला आहे.

दरम्यान, अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी कंगना सातत्याने तिचं मत मांडत होती. यामध्येच तिने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केली होती. तिच्या या वक्तव्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. अनेकांनी तिच्यावर टीकास्त्र डागलं होतं. इतकंच नाही तर शिवसेना खासदार संजय राऊत यांनीदेखील कंगनावर कठोर टीका केली होती. तेव्हापासून कंगना आणि संजय राऊत यांच्यात शीतयुद्ध सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे.