पाकिस्तानी दहशतवादी वकास शेख आणि इंडियन मुजाहिदीनचा दहशतवादी तहसीन अख्तर याचा १३ जुलै २०११ रोजी मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटाशी थेट संबंध असल्यामुळे त्यांचा ताबा मिळविण्यासाठी राज्याचा दहशतवादविरोधी विभाग खूपच उत्सुक आहे.
एटीएस यासिनसह वकास, तहसीन तसेच तबरेज या दहशतवाद्यांच्या शोधात होते. तिघे हाती लागल्यामुळे मुंबई बॉम्बस्फोट कटाचा उलगडा करणे सहजशक्य होईल, असेही या सूत्रांनी स्पष्ट केले. एटीएसने आतापर्यंत केलेल्या कारवाईत अटक केलेल्या सगळ्यांचाच या खटल्याशी संबंध असल्याचे स्पष्ट करणे त्यामुळे अधिकच सोपे होणार आहे, असेही या सूत्रांनी सांगितले.
ऑगस्ट २०१३ मध्ये यासिनला अटक झाल्यानंतर इंडियन मुजाहिदीनची सूत्रे तेहसीनकडे आली होती. बिहारमध्ये यासिनसमवेत त्याने दहशतवादी गट स्थापन केला होता.
यासिनच्या अटकेनंतर बिहारमधून त्याने आपला मोर्चा झारखंड, राजस्थान येथे वळविला होता. निवडणुकीच्या काळात घातपात घडविण्याचा या गटाचा प्रयत्न होता आणि त्याचा सूत्रधार तेहसीन होता, असेही या वरिष्ठ सूत्रांनी स्पष्ट केले.
यासिनची जबानी राज्याच्या एटीएसने नोंदविली आहे. आता वकास आणि तेहसीनचा ताबा मिळाल्यावर १३ जुलैचा बॉम्बस्फोट खटला अधिक मजबूत होणार आहे, असेही या सूत्रांनी सांगितले.