विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिकेवर भाजपा झेंडा फडकवेल, असा विश्वास व्यक्त केल्यानंतर, शिवसेनेकडून त्यावर निशाणा साधण्यात आला. त्यावर आता भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी उत्तर दिलं आहे.

”महापालिकेवरून भगवा उतरणार नाही या सामानातल्या भावनेशी मी सहमत आहे. फरक एवढाच की यावेळी भाजपाचा भगवा फडकेल. शिवसेनाप्रमुखांनी आयुष्यभर मिरवलेले हिंदुहृदयसम्राट हे बिरुद सत्तेच्या सोयीसाठी नाकारणाऱ्या शिवसेनेला जनता पाताळात गाडेल, २०२२ मध्ये त्याची सुरुवात होणार आहे” असं भातखळकर यांनी ट्विट केलं आहे.

आणखी वाचा- “भगवा तर तुम्ही तुमच्याच हातानं उतरवला, आता मुंबईकर करून दाखवतील”

तर, मुंबई महापालिका ही मराठी अभिमान, स्वाभिमानाचे प्रतीक आहे. जोपर्यंत पालिकेवर भगवा आहे. तोपर्यंत महाराष्ट्र दुश्मनांचे पाशवी हात मुंबईच्या गळय़ापर्यंत पोहोचणार नाहीत. मुंबई भांडवलदारांची बटीक होण्यापासून रोखण्याचे काम याच तेजस्वी भगव्याने केले आहे. मुंबईवरील भगवा उतरविण्याचे स्वप्न ज्यांनी पाहिले ते राजकारण आणि सार्वजनिक जीवनातून कायमचे नेस्तनाबूत झाले, असे म्हणत शिवसेनेने भाजपावर निशाणा साधलेला आहे.

आणखी वाचा- “मुंबई महापालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढवेल, शिवसेनेशी युतीची गरज नाही”

मुंबई महापालिकेवरील भगवा उतरविण्याची भाषा करणे म्हणजे महाराष्ट्राचा मुंबईवरील हक्क नाकारण्यासारखेच आहे. मुंबई महापालिकेवरील भगव्यास हात घालू असे सांगणे म्हणजे मराठी माणसांचे मुंबईशी नाते तोडण्यासारखेच आहे. भगवा उतरविणे म्हणजे मुंबई पुन्हा भांडवलदारांच्या घशात घालून मराठी माणूस, श्रमिक, मजुरांना गुलाम करण्यासारखेच आहे. मुंबईवरील भगवा उतरविण्याची भाषा करणे ही १०५ मराठी हुतात्म्यांशी सरळ सरळ बेइमानी आहे, असंही सामनाच्या संपादकीयमध्ये म्हटलेलं आहे.