मुंबईतील रिक्षाचालक-मालक यांच्या विविध मागण्यांसाठी ‘मुंबई ऑटोरिक्षामेन्स’ या संघटनेने सोमवारी संप पुकारल्याने मुंबईकरांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी काही मार्गांवर बेस्टने जादा बस सोडल्या असल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. घाटकोपर, भांडूप, कांजुरमार्ग येथे सर्व रिक्षा बंद आहेत, तर वांद्रे येथे कमी संख्येने रिक्षा रस्त्यावर दिसत आहेत. काही रिक्षाचालकांनी सकाळी आपल्या रिक्षा रस्त्यावर उतरवल्या होत्या. पण युनियनच्या कार्यकर्त्यांनी धमक्या देऊन त्या बंद करायला लावल्याच्याही घटना समोर आल्या आहेत.

मुंबईतील तब्बल ८३ हजार रिक्षाचालक संपात सहभागी असल्यामुळे आठवडय़ाच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांना मोठय़ा समस्येला सामोरे जावे लागत आहे. खासगी रिक्षा-टॅक्सी समन्वयक कंपन्यांच्या मनमानी कारभाराला आळा घालण्यासाठी त्यांच्यासाठी नियमावली तयार करावी, ही प्रमुख मागणी मुंबई ऑटोरिक्षामेन्स युनियनने केली होती. मात्र, परिवहन विभाग आणि परिवहनमंत्री यांनी आश्वासने देऊनही याबाबत कोणतेही ठोस उपाय योजलेले नाहीत. त्यामुळे संघटनेने मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.