परिवहन मंत्र्यांची संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा मुंबई: गेल्या काही वर्षांत न झालेली भाडेवाढ आणि करोनाकाळात काळ्या-पिवळ्या रिक्षा-टॅक्सीचालकांचे बुडालेले उत्पन्न यामुळे भाडेवाढ करावी, अशी मागणी संघटनांनी परिवहनमंत्री अनिल परब यांच्याकडे नुकतीच केली आहे. याबाबत विचार केला जाईल, असे आश्वासन परिवहनमंत्र्यांकडून संघटनांना देण्यात आले आहे. पंधरा दिवसांत भाडेवाढीचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती ‘लोकसत्ता’शी बोलताना यावेळी अनिल परब यांनी दिली. भाडेवाढ झाल्यास प्रवाशांच्या खिशालाही काहीशी कात्री लागू शकते. मीटरवर धावणाऱ्या रिक्षाचे सध्याचे भाडे १८ रुपये आणि टॅक्सीचे २२ रुपये भाडे आहे. जून २०१५ मध्ये टॅक्सीच्या भाडेदरात १ रुपयांनी वाढ करण्यात आली होती. त्यामुळे २१ रुपयांवरून भाडे २२ रुपये झाले होते. तर याच वर्षांत रिक्षाच्याही भाडेदरात एक रुपयांची वाढ झाली होती. ही भाढेवाढ हकिम समितीनुसार प्रत्येक वर्षी दिली जात होती. परंतु या समितीच्या सूचना प्रवाशांच्याही हिताच्या नसल्याने त्याविरोधात प्रवासी संघटनांनी विरोध दर्शविला. त्यानंतर एकसदस्यीय खटुआ समितीची शिफारस करण्यात आली, परंतु रिक्षा-टॅक्सीच्या भाडेदरावर मात्र काही निर्णय झाला नाही. रिक्षा-टॅक्सी संघटनांनी भाडेवाढीसंदर्भात सातत्याने परिवहन विभागाकडे पत्रव्यवहार करतानाच परिवहनमंत्री, सचिव, परिवहन आयुक्तांच्या भेटीगाठीही घेतल्या. अखेर यावर विचार केला जात असल्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे. परवान्यांवर नियंत्रण ठेवा काही वर्षांपूर्वी रिक्षा परवाने खुले केले. त्यामुळे रिक्षांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढली. परिणामी वाहतूक कोंडीही होऊ लागली. काहींनी नुसतेच परवानेदेखील घेऊनही ठेवले. त्यामुळे या परवान्यांवर नियंत्रण ठेवण्याची मागणीही संघटनांनी केली आहे. पाच वर्षांत टॅक्सीची भाडेवाढ झालेली नाही. करोनाकाळात चालकांचे उत्पन्नच बुडाले. त्यामुळे आता २२ रुपयांवरून २५ रुपये भाडेदर करण्याची मागणी केली आहे, परंतु सरकार जी भाडेवाढ देईल, ती मान्य करू. ए. एल. क्वाड्रोस, महासचिव, मुंबई टॅक्सीमेन्स युनियन नुकतीच परिवहनमंत्र्यांसोबत बैठक झाली. त्यावेळी अनेक मागण्या केल्या. गेली पाच वर्षे भाडेवाढीची मागणी करत आहोत. त्यामुळे शासनाने भाडेवाढ केल्यास ते योग्यच राहील. तसेच करोनाकाळात चालकांचे उत्पन्न बुडाल्याने मदत म्हणूून दरमहा दहा हजार रुपये देण्याचीही मागणी केली आहे. - शशांक राव, अध्यक्ष, मुंबई ऑटोरिक्षा-टॅक्सीमेन्स युनियन