‘प्रशासन आणि जनता’ या विषयावर अविनाश धर्माधिकारी यांचे व्याख्यान महाराष्ट्राची तेजस्वी विचारपरंपरा आणि ते विचार तितक्याच खंबीरपणे, निर्भयतेने, मुद्देसूद मांडण्याची कला अंगी बाणवणारे वक्ते यांचा वारसा पुढे नेण्याच्या दृष्टीने ‘लोकसत्ता वक्ता दशसहस्रेषु’ या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. गेल्या दोन पर्वामध्ये मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर यावर्षीच्या पर्वातही राज्यभरातील तरुणाईच्या विचारांमधील प्रगल्भता या स्पर्धेवर आपला ठसा उमटवत आहे. वेगवेगळ्या शहरांमधून आपली वक्तृत्व कला सिद्ध करून शेवटच्या सामन्यासाठी आठ स्पर्धक सज्ज झाले असून या स्पर्धेचा महाअंतिम सामना आज, शुक्रवारी रंगणार आहे. महाअंतिम फेरी माटुंगा येथील यशवंत नाटय़ मंदिरात सायंकाळी सहा वाजता होणार आहे. महाअंतिम फेरीसाठी ज्येष्ठ निवृत्त सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी प्रमुख वक्ते व मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार असून ‘प्रशासन आणि mजनता’ या विषयावर ते आपले विचार व्यक्त करणार आहेत. ‘वीणा वर्ल्ड’ प्रस्तुत आणि पॉवर्ड बाय ‘बँक ऑफ महाराष्ट्र’, ‘विश्वेश्वर सहकारी बँक लि.-पुणे’, एमआयटी-औरंगाबाद, ‘इन्स्टिटय़ूट ऑफ करिअर डेव्हलपमेंट’ (आयसीडी-औरंगाबाद) ‘लोकसत्ता वक्ता दशसहस्रेषु’मध्ये महाराष्ट्राचा ‘वक्ता दशसहस्रेषु’चा मान कोण जिंकणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. तरुणाईच्या वैचारिकतेची कसोटी घेणाऱ्या या स्पर्धेसाठी गेली अनेक वर्षे आपल्या विचारांनी, अभ्यासाने तरुणांना दिशा देणारे, मार्गदर्शन करणारे अविनाश धर्माधिकारी हे प्रमुख वक्ते म्हणून लाभावेत, हा आणखी एक योग जुळून आला आहे. ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोग’ आणि ‘केंद्रीय लोकसेवा आयोगा’तर्फे घेण्यात येणाऱ्या स्पर्धात्मक परीक्षांसाठी बसणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी धर्माधिकारी यांनी ‘चाणक्य मंडळ’ ही संस्था स्थापन केली आहे. स्पर्धा परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांना सातत्याने मार्गदर्शन करण्याचे काम गेली अनेक वर्षे ‘चाणक्य मंडळ’तर्फे केले जात आहे. ‘अस्वस्थ दशकाची डायरी’, ‘नवा विजयपथ’, ‘स्वतंत्र नागरिक’, ‘१० वी, १२ वीनंतरचे करिअर आणि व्यक्तिमत्त्व विकास’, ‘आधुनिक भारताचा इतिहास’ (ऑडिओ बुक), ‘आणि आपण सगळेच’, ‘िजकणारा समाज घडविण्यासाठी’ आदी पुस्तकांचे लेखक तसेच अभ्यासू वक्ते, विचारवंत म्हणूनही धर्माधिकारी यांची ओळख आहे. त्यांच्या उपस्थितीत आठही स्पर्धकांना चुरशीची लढत देत ‘वक्ता दशसहस्रेषु’चा किताब जिंकायचा आहे. महाअंतिम फे रीत उतरण्यापूर्वी या स्पर्धकांची कसून तयारी करून घेण्यात आली आहे. स्पर्धेतील परीक्षकांनी वेळोवेळी के लेल्या मार्गदर्शनाबरोबरच महाअंतिम फेरीच्या तयारीसाठी या स्पर्धकांची ‘लोकसत्ता’ने विशेष कार्यशाळा घेतली. या कार्यशाळेत सुप्रसिद्ध अभिनेत्री संपदा जोगळेकर-कुलकर्णी आणि आरजे रश्मी वारंग यांनी स्पर्धकांना विशेष मार्गदर्शन केले. ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी या कार्यशाळेचा समारोप केला. ‘लोकसत्ता वक्तादशसहस्रेषु’चा हा महाअंतिम सामना अनुभवण्याची संधी मुंबईकरांना उपलब्ध झाली आहे. स्पर्धेतील आठही स्पर्धकांचे भाषण आणि या स्पर्धेच्या निमित्ताने अविनाश धर्माधिकारी यांचे विचारही ऐकण्याची संधी श्रोत्यांना मिळणार आहे. यासाठी ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर विनामूल्य प्रवेश देण्यात येणार असून काही जागा निमंत्रितांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. महाअंतिम फेरी.. कुठे : यशवंत नाटय़मंदिर, माटुंगा. कधी : आज, १७ फेब्रुवारी, संध्याकाळी सहा वाजता. प्रवेश विनामूल्य.