भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे १२५ वे जयंती वर्ष सामाजिक समता व न्याय वर्ष म्हणून साजरे करण्याचा व त्यासाठी १२५ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्याचा निर्णय मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाने घेतला. त्यानुसार या वर्षांत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत, अशी माहिती सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी पत्रकारांना दिली. डॉ. आंबेडकरांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्षांत इंदू मिलच्या जमिनीवर स्मारक उभारण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. आंबेडकरांच्या जीवनाशी निगडित असलेली घटनास्थळे व महत्त्वाच्या ऐतिहासिक स्थळांना पर्यटन स्थळाचा दर्जा देऊन त्यांचा विकास करणे, अनुसूचित जातीमधील नोकरी करणाऱ्या महिलांसाठी मुंबई, पुणे, नागपूर येथे वसतिगृहे बांधणे, मुलींसाठी तालुका स्तरावर वसतिगृहे बांधणे, दलित वस्त्यांची सुधारणा, दलित उद्योजकांना प्रोत्साहन, भागभांडवल पुरविणे, आंबेडकरांच्या दुर्मिळ छायाचित्रांचे व साहित्याचे प्रकाशन करणे इत्यादी उपक्रम वर्षभर राबविण्यात येणार आहेत. केंद्र सरकारच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाऊंडेशनच्या धर्तीवर राज्यातही त्यांच्या नावाने समता प्रतिष्ठान स्थापन करण्यात येणार आहे. वर्षभर राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांसाठी १२५ कटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.