महाराष्ट्राला वारसा आहे सामाजिक चळवळींचा. पर्यावरण चळवळी हा त्याचाच अविभाज्य घटक. या कार्यात झोकून दिलेले राज्यभरातील कार्यकत्रे, अभ्यासक एकाच व्यासपीठावर येणार आहेत ते ‘लोकसत्ता बदलता महाराष्ट्र’ उपक्रमाअंतर्गत आयोजित होत असलेल्या ‘आपण आणि पर्यावरण’ या परिषदेत. ५ आणि ६ ऑक्टोबर रोजी ‘टीजेएसबी सहकारी बँक लि.’च्या सहकार्याने होणाऱ्या या परिषदेला ‘रिजन्सी ग्रुप’ आणि ‘केसरी’ यांची मदत मिळाली आहे.

जंगलांच्या कथा जेवढय़ा रोमांचक तेवढय़ाच त्यांच्या व्यथा गहिऱ्या. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत आणि सहभागाने या परिसंवादाचे ‘जंगलाच्या कथा आणि व्यथा’ हे पहिले सत्र गुंफले जाणार आहे. त्यांच्यासोबत जंगलांच्या वळणवाटांचे जाणकार आणि नागपूर येथील ‘सातपुडा फाउंडेशन’चे संस्थापक किशोर रिठे व पश्चिम किनाऱ्यावरील तिवरांचा व शहरी जंगलांच्या व्यथावेदनांचा अभ्यास करणारे विवेक कुळकर्णी जंगलांच्या सद्यस्थितीवर भाष्य करतील.

निसर्गात सर्वत्र अस्तित्व दाखवणाऱ्या पाण्याच्या कथा, संवर्धनासाठी सुरू असलेल्या चळवळी आणि प्रदूषणचा विळखा सोडविण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न यांची चर्चा होणार आहे. ‘पाणी नेमके कुठे मुरतेय..’ या दुसऱ्या चर्चासत्रात. सजीव आणि पाणी यांच्या परस्परसंबंधांचा अभ्यास करणारे ‘महाराष्ट्र निसर्ग उद्याना’चे उपसंचालक अविनाश कुबल, खाणींमुळे नद्यांवर होत असलेल्या परिणामांवर संशोधन करणारे व नागपूरच्या ‘राजीव गांधी अभियांत्रिकी, संशोधन आणि तंत्रज्ञान महाविद्यालया’तील प्राध्यापक सचिन वझलवार व औरंगाबादमध्ये जलसंवर्धन आणि पाण्याच्या पुनरुज्जीवनाचे भगीरथी कार्य हाती घेतलेले डॉ. प्रसन्न पाटील या चर्चासत्रात सहभागी होत आहेत.

पर्यावरणाचाच घटक असलेल्या मानवाला पर्यावरणातील असंतुलनाचा फटका बसणारच! माणसाच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि आरोग्यावर परिणाम करणारे घटक चíचले जातील ‘पर्यावरणीय असंतुलन आणि आपण’ या तिसऱ्या सत्रात. पर्यावरणाचा सामाजिक दृष्टीकोनातून विचार करणारे पर्यावरणतज्ज्ञ अतुल देऊळगावकर, मुंबई-ठाण्यातील बिबळ्यांना आणि सावंतवाडीतील हत्तींना सामोरे जाताना मानव-वन्यजीव संघर्ष जवळून हाताळणाऱ्या पशुवैद्यक अधिकारी डॉ. विनया जंगले आणि केईएम रुग्णालयात समाजवैद्यक विभागात कार्यरत असताना अनेक सामाजिक चळवळींमध्ये सहभाग घेणाऱ्या डॉ. कामाक्षी भाटे या व्यापक विषयाचा आढावा घेतील. दुसऱ्या दिवशी शहरातील प्रदूषणाच्या ज्वलंत मुद्द्याला         ‘शहर व पर्यावरण’ या चर्चासत्रातून हात घातला जाईल. नियमांचा पुरेपूर उपयोग करत प्रशासनाची घडी बसवणारे, कायदे तोडणाऱ्यांवर जरब बसवणारे ‘पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा’चे आयुक्त महेश झगडे, ठाण्यातील पर्यावरण चळवळीतील अग्रणी आणि ‘पर्यावरण दक्षता मंचा’चे विद्याधर वालावलकर आणि पुण्याच्या पर्यावरण संवर्धनात महत्त्वाचा वाटा असलेले सुजित पटवर्धन यात सहभागी होत आहेत. ध्वनी, पाणी व हवेच्या प्रदूषणासोबतच महानगरांना सामना कराव्या लागणाऱ्या प्रकाश प्रदूषणाची माहिती देतील जपानमधील ‘केईके’मधून भौतिकशास्त्रात डॉक्टरेट केलेले डॉ. अभय देशपांडे.

केवळ शहरापुरतीच मर्यादित न राहता जगाला हवालदिल करू पाहणारी ‘कचऱ्याची समस्या, तशी महत्त्वाची’ ठरत आहेत. कचऱ्यातून वीजनिर्मितीचा अफलातून प्रयोग करणारे ‘भाभा अणुसंशोधन केंद्रा’चे संधोधक डॉ. शरद काळे, ‘स्वच्छ भारत अभियाना’च्या आखणीत सहभागी असलेल्या ‘आयआयटी’च्या ‘पर्यावरण आणि अभियांत्रिकी विभागा’चे प्रमुख डॉ. श्याम आसोलेकर आणि गेली पंचवीस वष्रे खगोलमंडळ संस्थेमधून कार्यरत असणारे डॉ. अभय देशपांडे कचऱ्याच्या सर्वव्यापी समस्येवर पाचव्या सत्रात उत्तर देतील.

जागतिक स्तरावर पर्यावरणाची चर्चा सुरू असताना अपरिहार्यपणे मुद्दा येतो तो अर्थकारणाचा.

‘पर्यावरण आणि अर्थकारण’ या शेवटच्या सत्रात पर्यावरणामागे असलेल्या अर्थकारणाचा वेध घेतील केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर, पर्यावरणतज्ज्ञ अतुल देऊळगावकर आणि उद्योजक व पर्यावरण अभ्यासक डॉ. विवेक भिडे. पर्यावरणाचा साकल्याने अभ्यास करून, समस्या समजून त्यातून मार्ग काढण्यासाठी धडपडत असलेल्या पर्यावरणाच्या हजारो कार्यकर्त्यांना आणि निसर्गप्रेमींना या परिषदेतून प्रेरणा मिळेल, ही अपेक्षा आयोजनामागे आहे.