स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना संपूर्ण राज्यात राबवण्याचा निर्णय आज राज्यमंत्रिमंडळानं घेतला आहे. या विमा योजनेसाठी राज्य आरोग्य हमी सोसायटीला आर्थिक अनुदान उपलब्ध करून दिलं जाणार आहे. त्याचप्रमाणे विहित पद्धतीने विमा कंपन्यांची निवड करण्यात येणार आहे. रस्त्यांवर होणाऱ्या अपघातात तातडीने उपचार व्हावेत यासाठी ही योजना असल्याचं सांगण्यात आलं आहे. या योजनेसाठी १२५ कोटी रुपये लागणार आहेत. राज्यातील तत्कालीन शिवसेना-भाजपच्या सरकारच्या कार्यकाळातील ही योजना असून, चार वर्षांनी अखरे या या योजनेस मंजुरी मिळाली आहे. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.#मंत्रिमंडळनिर्णय pic.twitter.com/i0N4vQHnM9 — CMO Maharashtra (@CMOMaharashtra) September 16, 2020 अपघातानंतर मोफत उपचार मिळावेत, यासाठी ही योजना सुरू करण्यात येत आहे. या योजनेत ७४ पॅकेज असतील. तसेच, राज्यातील अनेक रुग्णालयांचा यामध्ये समावेश केला जाणार आहे. महाराष्ट्रातील रस्त्यावर झालेल्या अपघातामधील व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळणार आहे. ही व्यक्ती कोणत्याही राज्य, देशाची असली तरीदेखील त्यांना योग्य ते वैद्यकीय उपचार मिळणार आहेत. सुमारे ७४ उपचार पद्धतीतून ३० हजार रुपयांपर्यंतचा खर्च मोफत केला जाणार आहे. यामध्ये अतिदक्षता विभाग व वॉर्डामधील उपचार, अस्थिभंग तसेच रुग्णलयाच्या वास्तव्यातील भोजनाचा समावेश असणार आहे.