टोलनाक्यावरील रांगांतून वाहनांची सुटका

मुंबई: राजीव गांधी सागरी सेतू (वांद्रे ते वरळी सागरी सेतू) पथकर नाक्यावर शुक्रवारपासून फास्टॅग प्रणाली कार्यान्वित करण्यात आली. फास्टॅग प्रणाली लागू झालेला मुंबईतील पहिला पथकर नाका ठरला आहे. त्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या वाहनचालकांना टोल भरण्यासाठी रांगेत प्रतीक्षा न करता थेट जाता येणार आहे. या वाहनांच्या टोलची रक्कम चालक-मालकाच्या खात्यातून वळती केली जाईल.

झटपट प्रवासासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारित असलेल्या टोलनाक्यांवर फास्टॅगची अंमलबजावणी सुरू झाली आहे. मात्र मुंबई महानगर क्षेत्रातील काही टोलनाक्यांवर अद्यापही त्याची अंमलबजावणी झालेली नाही. मुंबईतील राजीव गांधी सागरी सेतूच्या पथकर नाक्यावरही फास्टॅग नव्हते. मात्र २५ जानेवारीपासून त्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने घेतला. सागरी सेतूच्या पथकर नाक्यावर १६ मार्गिका असून पहिल्या टप्यात सहा मार्गिका या फास्टॅग वाहनधारकांसाठी राखीव असतील, अशी माहिती दिली. पुढील काही दिवसांमध्ये आणखी सहा मार्गिका फास्टॅगमध्ये रूपांतरित करण्यात येतील. उर्वरित चार मार्गिका वाहन चालकांसाठी रोख भरणा करण्यासाठी म्हणून उपलब्ध राहतील.

‘मुंबईकरांचा प्रवास वेगवान होणार असून वाहन चालकांना नाक्यावर रांगेत थांबण्याची  गरज भासणार नाही. इतर पथकर नाक्यावर ही प्रणाली कार्यान्वित करण्यात येत आहे, ’असे राज्य रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे यांनी सांगितले.

वाहनचालकांना फास्टॅग विकत घेण्यासाठी पथकर नाक्यावर सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.  आयडीएफसी बँकेमार्फत पथकर नाक्यावर फास्टॅगसाठी ‘पॉइंट ऑफ सेल’ मशिन उपलब्ध केले आहे.

मासिक पासधारक

राजीव गांधी सागरी सेतूच्या मासिक पासधारकांचा पास नेहमीच्या प्रचलित पद्धतीनुसार पासच्या वैधतेपर्यंत वापरता येईल. फास्टॅग प्रणालीमुळे त्यावर काही विपरित परिणाम होणार नाही. भविष्यात सगळी ‘मासिक पास’ सुविधा ‘फास्टॅग’ मार्फत करण्यात येईल. त्यासाठी मासिक पासधारकांना ‘एमईपी’ कंपनीमार्फत मार्चपर्यंत फास्टॅग प्रणालीत परिवर्तित होण्याची मुभा दिली आहे.