2018 वर्ष संपण्यासाठी फक्त दोन दिवस बाकी राहिले आहेत. सध्या देशभरात नववर्षाच्या स्वागताची जल्लोषात तयारी सुरु आहे. नववर्षाचं स्वागत करण्यासाठी मुंबईकरदेखील सज्ज असून अनेकजण रात्रभर शहरात फिरणं पसंत करतात. शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून नववर्षनिमित्त बाजारपेठा २४ तास सुरू ठेवण्याची मागणी केली होती. दरम्यान राज्य सरकारने नववर्षाच्या स्वागतासाठी ही परवानगी दिली असून 31 डिसेंबरच्या रात्री पब, बार आणि हॉटेल्स सुरु राहणार आहेत.

दरम्यान नववर्षाचं स्वागत होत असताना काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस सज्ज असून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. मुंबईत तब्बल 40 हजार पोलिसांचा पहारा असणार असून यावेळी त्यांची मुंबईकरांवर आणि खासकरुन तळीरामांवर नजर असणार आहे. महिलांची छेडछाड रोखण्यासाठी पोलीस साध्या वेषात वावरणार आहेत. यासोबत लाईव्ह कॅमेरानेही पोलीस मुंबईवर लक्ष ठेवतील अशी माहिती डीसीपी मुंबई पोलीस पीआरओ मंजुनाथ सिंगे यांनी दिली आहे.

आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे या शहरांच्या अनिवासी भागातील बाजारपेठा २४ तास सुरू ठेवण्याची मागणी केली होती. त्यांनी आपलं हे पत्र ट्विटरवर शेअरही केलं होतं.

पुणे, मुंबई, नवी मुंबई आदी शहरांच्या अनिवासी भागातील, मिलच्या जमिनीवरील दुकाने, मॉल, हॉटेल सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी. यामुळे राज्याच्या महसूलात वाढ होईल, शिवाय रोजगारही उपलब्ध होतील असं त्यांनी म्हटलं होतं.

आदित्य ठाकरे नाइट लाईफसाठी आग्रही असून त्यांनी वारंवार त्याचा पाठपुरावा केला आहे. नाइट लाइफच्या प्रस्तावाला मुंबई महापालिकेने परवानगी दिली आहे. या प्रस्तावात मुंबईतील दुकाने, हॉटेल्स २४ तास सुरू ठेवावीत असा उल्लेख आहे. मुंबई पोलिसांनीही हा प्रस्ताव स्विकारला आहे. सध्या हा प्रस्ताव राज्याच्या गृहखात्याकडे मंजुरीसाठी असल्याचं आदित्य ठाकरेंनी पत्रात म्हटलं आहे.