मुंबईतील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासासाठी महिनाभरात धोरण जाहीर करुन पावले टाकणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांना सांगितले. आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेऊन भाजपला राजकीय लाभ मिळावा, यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी पावले टाकण्यास सुरुवात केली असून बीडीडी चाळीतील रहिवाशांना दिलासा देऊन त्याचा लाभ भाजप उठविणार आहे.

बहुतेक बीडीडी चाळींची दुरवस्था असून गेली अनेक वर्षे त्यांच्या पुनर्विकासाचा प्रश्न रखडला आहे. तो मार्गी लावण्यासंदर्भात आणि केंद्र सरकारच्या ‘सर्वासाठी घर’ योजनेच्या आढाव्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. बीडीडी चाळींचा प्रश्न सोडविण्यासाठी कोणती पावले टाकायची याचा तपशील ठरविला जात आहे.