महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोगाने दिलेला वीज बचतीचा मंत्र जपत बेस्ट उपक्रमाने मुंबईतील तब्बल १० लाख ग्राहकांकडील पंखा, टय़ूब लाईट आणि वातानुकुलीन यंत्रणा बदलण्याचा निर्णय घेतला आहे. या आगळ्या वेगळ्या उपक्रमासाठी निवासी आणि व्यावसायिक ग्राहकांना अनुदान मिळणार आहे.
मुंबईतील वीज ग्राहकांना विजेची बचत करणारी उपकरणे उपलब्ध करावीत, असे आदेश महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोगाने बेस्टला दिले आहेत. या आदेशाचे काटेकोरपणे पालन करण्याचा निर्णय बेस्टने घेतला आहे. त्यानुसार मुंबईतील निवासी आणि व्यावसायिक अशा मिळून सुमारे १० लाख वीज ग्राहकांकडील विद्युत उपकरणे बदलण्यात येणार आहेत. सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर २० हजार निवासी आणि पाच हजार व्यावसायिक ग्राहकांना १ मार्चपासून विजेची बचत करणारी उपकरणे पुरविण्यात येणार आहेत.
ग्राहकांच्या घरी जाऊन वीज बचत करणाऱ्या ईई टी ५ एफटीएल टय़ुब बसविण्यात येणार आहेत. निवासी ग्राहकाच्या घरी दोन, तर व्यावसायिक ग्राहकाच्या कार्यालयात-दुकानात ५ टय़ूब बसविण्याचा बेस्टचा मानस आहे, अशी माहिती बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक ओमप्रकाश गुप्ता यांनी बेस्ट समितीच्या मंगळवारच्या बैठकीत दिली. बेस्ट समितीच्या बैठकीत सादर करण्यात आलेल्या याबाबतच्या प्रस्तावास सर्व पक्षांच्या नगरसेवकांनी एकमताने मंजुरी दिली.
ईई टी ५ एफटीएल टय़ुबची किंमत ६०७ रुपये आहे. या टय़ुब लाईटमुळे प्रतिदिनी दीड ते दोन युनिटची बचत होईल. परिणामी महिनाकाठी ग्राहकांची किमान ३० रुपये बचत होऊ शकेल. या टय़ुबसाठी निवासी ग्राहकांना २०० रुपये, तर व्यावसायिक ग्राहकांना १५० रुपये अनुदान देण्यात येणार आहे. उर्वरित अनुक्रमे ४०० व ४५० रुपये ग्राहकांनाच भरावे लागणार आहेत.

पालिका शाळांमधील १० वीच्या विद्यार्थ्यांना सवलत
दहावीच्या परीक्षेला बसलेल्या पालिका शाळांतील विद्यार्थ्यांना परीक्षा काळात बेस्टच्या बसगाडय़ांमधून निम्मे भाडे भरून प्रवास करण्याची मुभा बेस्ट प्रशासनाने दिली आहे.
येत्या २ मार्चपासून दहावीची परीक्षा सुरू होत आहे. पालिका शाळांमधील दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी भाडय़ात ५० टक्के सवलत देण्याची मागणी करण्यात येत होती. प्रशासनाने ती मान्य केली. दरम्यान, दहावीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना बेस्ट बसमधून सवलतीमध्ये प्रवास करण्याबाबत लवकरच एक धोरण निश्चित करण्यात येणार आहे.